केरळच्या अझिककल किनाऱ्याजवळ सिंगापूरचा ध्वज असलेले मालवाहू जहाज 'एमव्ही वान हाय ५०३'मध्ये झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीवर अद्याप नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीतून आतापर्यंत १८ क्रू मेंबर्सना सुखरूप वाचवण्यात आले असून, ४ जण अजूनही बेपत्ता आहेत. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाचे पथक बचाव व अग्निशमन कार्यात पूर्ण क्षमतेने सहभागी झाले आहे.
भारतीय तटरक्षक दलाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, “स्फोट आणि आग मुख्यतः जहाजाच्या मध्यभागी व निवास ब्लॉकच्या समोरील कंटेनरमध्ये होत आहेत. जहाजाच्या पुढील भागातील आग काही प्रमाणात नियंत्रणात आली असली तरी, तिथून अजूनही दाट धुराचे लोट बाहेर येत आहेत. जहाज सध्या बंदराच्या दिशेने सुमारे १०-१५ अंश झुकले आहे आणि काही कंटेनर्स समुद्रात कोसळल्याचेही निदर्शनास आले आहे.”
भारतीय नौदलाचे रेस्क्यू ऑपरेशन
कोची येथून दाखल झालेले 'आयसीजी समर्थ' आणि समुद्र प्रहारी व सचेत अशी इतर जहाजे या संकटकाळात आग विझवणे आणि जहाजाच्या भागांची शीतकरण करण्याची प्रक्रिया करत आहेत. या बचाव मोहिमेत भारतीय नौदलाची आयएनएस सुरत ही युद्धनौका देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
नेमकं झालं काय?
ही दुर्घटना सोमवारी सकाळी घडली. कन्नूर येथील अझिककल किनाऱ्यापासून सुमारे ४४ नॉटिकल मैलांवर असताना या मालवाहू जहाजातील एका कंटेनरमध्ये स्फोट झाला. काही वेळातच आगीने तीव्र रूप धारण केल्याने कर्मचाऱ्यांना तातडीने जहाज सोडावे लागले.
एमव्ही वान हाय ५०३ हे मालवाहू जहाज श्रीलंकेच्या कोलंबो बंदरातून भारताच्या न्हावा शेवा बंदराकडे जात होते. स्फोटानंतर जहाजातील कर्मचाऱ्यांनी लाईफ राफ्ट्सचा वापर करून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. आयएनएस सुरतच्या मदतीने त्यापैकी १८ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढून सोमवारी संध्याकाळी मंगलोर बंदरात आणण्यात आले. भारतीय तटरक्षक दलाकडून बचाव कार्य सुरू असून, बेपत्ता चार सदस्यांचा शोध अद्याप सुरू आहे. पुढील अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.