अधिवेशनकाळात प्रधान सचिवांना मुंबईबाहेर जाण्यास मनाई
By admin | Updated: June 1, 2014 00:32 IST
मुख्य सचिवांचा फतवा : प्रश्नाचे उत्तर प्रलंबित राहिल्यास कडक कारवाई
अधिवेशनकाळात प्रधान सचिवांना मुंबईबाहेर जाण्यास मनाई
मुख्य सचिवांचा फतवा : प्रश्नाचे उत्तर प्रलंबित राहिल्यास कडक कारवाईनारायण जाधव /ठाणे : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २ जूनपासून मुंबईत सुरू होत असून, या काळात विधान मंडळाच्या उभय सभागृहांच्या कामकाजात कोणत्याही बाबींच्या अनुषंगाने, कोणत्याही विभागाचा मुद्दा चर्चेस उपस्थित येऊ शकतो. यामुळे त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी मुख्य सचिव जे़ एस़ सहारिया यांनी सर्व मंत्रालयीन विभागांच्या अपर मुख्य सचिव, प्रधान सचिवांसह सचिवांना अधिवेशन काळात सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत़ याबाबत तातडीने आदेश काढून सहारिया यांनी सर्व संबंधित सचिवांना सूचना दिलेल्या आहेत. विधान मंडळाच्या सभागृहात तारांकित व अतारांकित प्रश्न, लक्षवेधी, औचित्य, नियम ९३अन्वये स्थगन प्रस्ताव, विशेष उल्लेख या संसदीय आयुधांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊ शकते़ त्यावर शासनाकडून तत्काळ विहित कालावधीत कार्यवाही अपेक्षित असते़ मात्र, बर्याचदा ती होत नसल्याने सदस्यांकडून नापसंती व्यक्त होऊन प्रसंगी संबंधित मंत्री अडचणीत येऊ शकतात, यामुळे पिठासीन अधिकार्यांना वारंवार बैठक घेऊन शासनाला निर्देश द्यावे लागतात. हे प्रकार टाळण्यासाठी मुख्य सचिवांनी हा फतवा काढला आहे़ सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सर्वसमावेशक उत्तरे देता यावीत, ती परिपूर्ण असावीत, याची दक्षता घेण्याचेही सहारिया यांनी संबंधित सचिवांना बजावले असून त्याचा अहवाल त्यांनाही दर आठवड्याच्या पहिल्या दिवशी द्यावेत, असे ही म्हटले आहे़या आदेशांचे जे सचिव पालन करणार नाहीत, विहित कालमर्यादेत त्यांना आखून दिलेली कोणतीही बाब प्रलंबित राहिल्यास संबंधित विभागाच्या सचिवावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात बजावण्यात आले आहे़ काही अपरिहार्य परिस्थितीत एखाद्या सचिवास अधिवेशन काळात मुंबई बाहेर जाणे आवश्यक असल्यास त्यांनी संबंधित विभागाचे मंत्री किंवा आपली परवानगी घेऊनच जावे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे़