नवी दिल्ली : इम्फाळ आणि गुवाहाटी भागात ८८ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, चार तस्करांना जेरबंद करण्यात आले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी म्हटले आहे.
शाह यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे की, अमली पदार्थांच्या तस्करांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही. मोदी सरकारच्या अमली पदार्थमुक्त भारत निर्माण अभियानाला गती देताना ८८ कोटी रुपयांच्या मेथमफेटामाईन गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत तस्करांच्या टोळीतील चार सदस्यांना अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई करण्यासाठी १३ मार्च रोजी एक मोहीम राबविण्यात आली होती. एनसीबी पथकाने लिलोंग भागाजवळ एक वाहन रोखून तपासणी केली असता, टूल बॉक्समधून १०२.३९ किलो मेथमफेटामाईच्या गोळ्या जप्त केल्या. यावेळी ट्रकमधील दोन जणांना जेरबंद केले.
एनसीबी पथकाचे केले अभिनंदनया अमली पदार्थांचा स्रोत मणिपूरच्या मोरेह शहरात आहे. या प्रकरणात अडकलेल्या इतरांना पकडण्यासाठी तपास सुरू आहे.
दरम्यान, अन्य एका निवेदनानुसार, त्याच दिवशी अन्य एका कारवाईत सिल्चरजवळ आसाम-मिझोराम सीमेवर एका एसयूव्हीची तपासणी केली असता, अतिरिक्त टायरमध्ये लपविलेल्या ७.४८ किलो मेथमफेटामाईनच्या गोळ्या जप्त केल्या.
पथकाने तातडीने कारवाई करीत तस्करीसाठी वापरण्यात येणारे चारचाकी वाहन जप्त केले व नंतर संबंधितांना अटक केली. या कारवाईसाठी गृहमंत्र्यांनी एनसीबी पथकाचे अभिनंदन केले आहे.
ईशान्य भाग संवेदनशीलईशान्येकडील भागात अमली पदार्थांच्या विरोधात मोठी मोहीम वेळोवेळी राबविण्यात येत आहे. या तस्करीचे आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय संबंधही शोधून काढण्यात येत आहेत. ईशान्येकडील भाग भौगोलिक स्थितीमुळे अमली पदार्थांच्या तस्करीसाठी भारताच्या सर्वांत संवेदनशील क्षेत्रांपैकी एक आहे.