DMK MP Kanimozhi on national language of India: दक्षिण भारतातील राज्यांमध्ये भाषेच्या मुद्द्यावरुन गेल्या काही महिन्यांपासून वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. भाषेच्या या मुद्द्यासाठी दक्षिणेतील सर्व पक्ष एकत्र देखील आले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर या मुद्द्याबाबत भारतीय राजकारण्याची भूमिका कौतुक करण्यासारखी आहे. अशातच तामिळनाडूच्या सत्ताधारी पक्षाच्या द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांनी भाषेबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊन १४० कोटी भारतीयांची मने जिंकली. भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणाऱ्या द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांनी सोमवारी स्पेनमध्ये बोलताना म्हटलं की, भारताची राष्ट्रभाषा एकता आणि विविधता आहे. हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगाला हाच संदेश देण्यासाठी आले आहे, असेही कनिमोळी म्हणाल्या.
दहशतवादावर पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरवर भारताची बाजू मांडण्यासाठी परदेश दौऱ्यावर गेलेले सर्वपक्षीय शिष्टमंडळ जागतिक स्तरावर भारताची मान उंचावताना दिसत आहे. यातील एक शिष्टमंडळ द्रमुक खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखाली स्पेनची राजधानी माद्रिद येथे पोहोचलं आहे. तिथल्या माध्यमांना आणि अनिवासी भारतीयांशी संवाद साधताना कनिमोळी यांनी राष्ट्रभाषेच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कनिमोळी यांच्या उत्तरानंतर सभागृह टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला.
"तुम्हाला भारताच्या राष्ट्रीय भाषेबद्दल जाणून घ्यायचे आहे, मला वाटते की भारताची राष्ट्रीय भाषा विविधतेत एकता आहे. हाच संदेश हे प्रतिनिधी मंडळ जगाला देत आहे आणि हीच आजची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे," असं कनिमोळी म्हणाल्या. कनिमोळी यांच्या या विधानानंतर, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंदीला विरोध वेगाने वाढत असतानाच द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनी हे विधान केले आहे. द्रमुकने अलीकडेच केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये समाविष्ट केलेल्या त्रिभाषिक सूत्राला विरोध केला आहे.
दुसरीकडे, कनिमोळी यांनी जगाला दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहनही केले. आता संपूर्ण जगाने दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याची वेळ आली असल्याचे कनिमोळी म्हणाल्या. याआधी कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी पाकिस्तान दहशतवाद्यांचा कारखाना असल्याचे म्हटलं होतं.