घनश्याम सोनार
मुंबई: राज्यातील ४०० वर्षांच्या ऐतिहासिक १७ कोटी दस्तऐवजांपैकी ६ कोटी कागदपत्रांचे डिजिटायझेशन मुंबईतील पुराभिलेख संचालनालयाकडून पूर्ण करण्यात आले आहे. मुंबईच्या पुराभिलेखागारात हे काम सुरू आहे. मुंबईत ब्रिटिशकालीन १० कोटी, तर राज्याच्या इतर कार्यालयातील शिवकालीन, पेशवेकालीन, निजामकालीन असे सात कोटी मिळून एकूण १६३० सालापासूनचे १७ कोटी ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध आहेत.
संपादक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राची मूळ प्रत तसेच महात्मा गांधींच्या दांडी यात्रेचा रोजचा अहवाल लंडनला टेलिग्रामद्वारे राणीला पाठविला जायचा. त्याची रोजनिशीदेखील येथे उपलब्ध आहे. हा ऐतिहासिक वारसा पुन्हा ३०० वर्षे टिकवण्याची किमया मायक्रोफिल्मिंग आणि डिजिटायझेशनद्वारे सुरू आहे.
उरलेल्या सर्व कागदपत्रांच्या डिजिटायझेशनचे काम २०२७पर्यंत पूर्ण होईल, असे पुराभिलेख संचालनालयाचे म्हणणे आहे.
...असे होते डिजिटायझेशन
जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांना खास कश्मिरी सिफाॅन कापड आणि जापानी टिश्यू पेपरने लेप दिला जातो. त्यानंतर अत्याधुनिक संगणकाद्वारे त्याचे स्कॅनिंग होते. अत्याधुनिक कॅमेराद्वारे त्याचे मायक्रोफिल्मिंग केले जाते. मुंबईत हवेतील असलेल्या आर्द्रतेच्या प्रमाणामुळे हे काम केवळ नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीतच होऊ शकते.
आम्ही केवळ दस्तऐवज ठेवत नाही, तर ते जसे आहे तसे जपतो. त्याचे संवर्धन करतो. या कामासाठी सांस्कृतिक विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे मार्गदर्शन आणि सांस्कृतिक विभागाचे मंत्री आशिष शेलार यांच्या पाठिंब्यामुळेच यावर्षी ८० कोटी रुपये मिळाले आहेत -सुजितकुमार उगले, संचालक, पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र