नवी दिल्ली : देशात गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल पेमेंटचे प्रमाण खूप वाढले आहे. भारताने विकसित केलेल्या युपीआय पेमेंट यंत्रणेचे तर जगभरात कौतुक होत आहे. याचा परिणाम रोखीने होणाऱ्या व्यवहारांवर होत आहे. यंदाच्या दिवाळीच्या आठवड्यात गेल्या २० वर्षांत पहिल्यांदाच चलनातील रोखीचे प्रमाण घटल्याचे दिसून आले आहे.
‘एसबीआय रिसर्च’ने जारी केलेल्या ताज्या ‘इकोरॅप’ अहवालात म्हटले आहे की, एकेकाळी रोखीवर चालणारी भारतीय अर्थव्यवस्था आता ‘स्मार्टफोन’वरील पेमेंट सिस्टीमवर चालताना दिसून येत आहे. डिजिटल पेमेंटचा वाढता वापर रिझर्व्ह बँक, सरकार या दोघांसाठीही लाभदायक आहे. त्यामुळे चलनी नोटांवरील खर्च कमी झाला आहे. तसेच अर्थव्यवस्थेचे रोखीवरील अवलंबित्वही घटले आहे. बॅंकेत खाते नसलेल्यांनाही व्यवहार करणे शक्य झाले आहे.