Manipur News : एकीकडे मणिपूर राज्यात राष्ट्रपती शासन लागू झाले आहे, तर दुसरीकडे येथील CRPF कॅम्पमधून धक्कादयक बातमी समोर आली आहे. एका सैनिकाने आपल्या साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात 3 जवानांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील लामफेल येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये आज(13 फेब्रुवारी) रात्री 8.20 वाजता घडली. आरोपी सैनिक संजय कुमार हा 120व्या बटालियनचा सार्जंट होता. त्याने अचानक आपल्या सर्व्हिस रायफलमधून गोळीबार सुरू केला. यानंतर आरोपीने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली. या हल्ल्यात इतर आठ जवानही जखमी झाले आहेत.
सर्व जखमींना तात्काळ इम्फाळ येथील रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या या गोळीबाराचे कारण समजू शकलेले नाही. सीआरपीएफच्या अधिका-यांनी सांगितले की, या घटनेचा तपास सुरू असून त्याची कारणे लवकरच समोर येतील. सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी कॅम्पमध्ये पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू
केंद्र सरकारने गुरुवारी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. 9 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला होता. मनीपूरमध्ये 21 महिन्यांपासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचारामुळे 300 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळेच बिरेन सिंह यांच्यावर राजीनामा देण्यासाठी खूप दबाव होता. विरोधी पक्षानेही या मुद्द्यावरुन भाजपला धारेवर धरले होते. अखेर मुख्यमंत्र्यांची नियुक्ती न केल्याने केंद्र सरकारकडून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.