शीलेश शर्मा, नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांनी ‘कॅग’बाबत केलेल्या टिप्पणीवर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘कॅग’च्या अहवालाचा राजकीय वापर करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला पाहिजे, असे वक्तव्य मोदींनी केले होते. मोदींचे ‘कॅग’बाबतचे विधान हे भाजपाच्या दुटप्पीपणाचे निदर्शक आहे, असे सांगून काँग्रेसचे प्रवक्ते शकील अहमद म्हणाले, ‘कॅग’च्या अहवालाचा मुद्दा बनवून पाच वर्षे संसदेत गदारोळ करीत राहिलेली आणि शेवटच्या अधिवेशनापर्यंत संसदेचे कामकाज बंद पाडणारी भाजपा आता आपली वेळ आल्यावर मात्र, ‘कॅग’च्या अहवालाचा राजकारणासाठी वापर केला जाऊ नये, असे प्रवचन देत आहे. गुजरात सरकारच्या कामकाजावर ‘कॅग’ने जे काही भाष्य केलेले आहे, त्यामुळे गुजरात सरकार आरोपीच्या पिंजर्यात उभे होईल की काय, या भयाने भाजपाला पछाडले आहे. ‘कॅग’ अहवालावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्ष दबाव आणणार, असेही अहमद म्हणाले. संसदेत बळकट विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यासाठी काँग्रेसने कंबर कसलेली आहे. यातील दुटप्पीपणा जनतेसमोर उघड करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले. संसदेत संख्याबळ कमी आहे आणि भाजपाशी दोन हात करण्याची आपली तयारी नाही, असा कोणताही संदेश जाऊ नये, याची काँग्रेस काळजी घेताना दिसत आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी शनिवारी आयोजित काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत नेमक्या याच अजेंड्यावर काम करणार आहेत. पक्षाच्या खासदारांनी लढवय्ये बनून भाजपाविरुद्ध आघाडी उघडण्याचे आवाहनही त्या करणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसचा आक्षेप
By admin | Updated: May 24, 2014 03:14 IST