नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयुक्त मतचोरीला संरक्षण देत आहेत. विरोधकांची नावे मतदार यादीतून वगळली जातात. त्यात प्रामुख्याने दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायाची नावे हटवण्यात आली. कर्नाटकच्या आळंद येथे ६०८० मते वगळण्यात आली. मतदारांची नावे जाणुनबुजून यादीतून काढण्यात आली. ज्यांच्या नावाने ही नावे काढली त्यांनाही याची कल्पना नाही. आळंदमध्ये याहून अधिक मते वगळली गेली असतील परंतु आम्ही ६ हजार मतदार काढले. इतर राज्यातील मोबाईल नंबर वापरून कर्नाटकातील मतदार यादीतून काढले गेले असं सांगत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला.
राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले की, भारताचे केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्या यंत्रणेला मदत करत आहेत. मी लोकसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून ही जबाबदारीने माहिती शेअर करत आहे. आम्ही पुराव्यासह या गोष्टी मांडत आहोत. १००० टक्के आम्ही सर्व पडताळणी करून या गोष्टी समोर आणत आहोत. भारताची लोकशाही वाचवणं हे आमचे कर्तव्य आहे. कर्नाटकातील आळंद मतदारसंघात ६०८० मतदारांची नावे वगळण्यात आली. कुणीतरी जाणुनबुजून हे करत होते. पूर्ण निवडणूक प्रक्रिया हायजॅक करण्यात आली असा आरोप करत राहुल गांधी यांनी वगळण्यात आलेल्या मतदारांनाच स्टेजवर आणले.
कर्नाटकातील आळंद येथे गोदाबाई नावाच्या महिलेचे नाव मतदार यादीतून काढण्यात आले. विविध १२ लोकांकडून हे नाव वगळण्यासाठी अर्ज केले गेले. संबंधित महिलेला याबाबत काहीच माहिती नव्हते. मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी वेगवेगळे मोबाईल नंबर वापरण्यात आले. बबिता चौधरी नावाच्या महिलेचे नाव मतदार यादीतून काढले गेले. सूर्यकांत नावाच्या व्यक्तीच्या मोबाईलवरून १२ लोकांची नावे वगळण्यासाठी मेसेज केले. त्यावर राहुल गांधी यांनी सूर्यकांत यांनाच स्टेजवर आणले. त्यावेळी त्यांनी माझ्या नावाने १२ लोकांची नावे वगळण्यात आली. मी कुणालाही मेसेज केला नव्हता असं सूर्यकांत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, कर्नाटक सीआयडीने यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर १८ वेळा निवडणूक आयोगाला पत्र पाठवले. परंतु निवडणूक आयोगाने त्यावर एकदाही उत्तर पाठवले नाही. ज्या ज्या बूथवर काँग्रेस मजबूत आहे. तिथे मतदारांची नावे वगळण्यात येत होती. निवडणूक आयोगाने हा पूर्ण तपास रोखला. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अनेक मतदारांची नावे यादीतून काढण्यात आली. महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही असेच घडले. हरियाणा येथेही हेच घडले. बोगस नावे, बनावट पत्ते देऊन मतदार वाढवण्यात आले. ज्ञानेश कुमार यांनी मतचोरीला पाठिंबा देणे थांबवले पाहिजे. निवडणूक आयोगाने १ आठवड्याच्या आत याचे पुरावे द्यावेत अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
याआधीही राहुल गांधींनी केला होता मतचोरीचा आरोप
लोकसभा निवडणुकीत तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने मतांची चोरी करून सत्ता मिळवली असा आरोप याआधीच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी केला होता. त्यात राहुल यांनी कर्नाटकातील दक्षिण बंगळुरू लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा मतदारसंघाचं उदाहरण दिले होते. त्यात अनेक दुबार मतदार, बनावट मतदार यांचा कागदपत्रासह खुलासा केला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी लवकरच हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचं सांगितले होते. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी आणि त्यांची टीम निवडणुकीतील मतचोरींवर रिसर्च करत आहेत. देशातील ४८ मतदारसंघावर काँग्रेसचं विशेष लक्ष आहे. त्यात मागील पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी प्रेझेंटेशन आणि कागदपत्रे दाखवत मोदी सरकारवर मतचोरीचा आरोप केला होता.