आपल्या विविध मागण्यांसाठी दीर्घकाळापासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेतली. मात्र आंदोलक शेतकरी संघटनेचे नेते आणि भगवंत मान यांच्यात बैठक सुरू असतानाच मुख्यमंत्री मान हे अचानक संतापून निघून गेले. यावेळी जा आंदोलन करत बसा, असेही त्यांनी शेतकऱ्यांना सुनावले. त्यामुळे शेतकरी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भगवंत मान हे रागारागाने निघून गेल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेतकरी नेत्यांनी सांगितले की, आमची बैठक व्यवस्थित सुरू होती. काही मागण्यांवरून तणाव निर्माण झाला. तसेच मुख्यमंत्र्यांनी संतापून आमचा अपमान केला. तुम्ही रस्त्यावर बसून आंदोलन करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले. तसेच ५ तारखेला आंदोलनाचा नेमका काय कार्यक्रम आहे, अशी माहिती विचारली.
दरम्यान, शेतकरी नेते जोगिंदर सिंह यांनी सांगितले की, पहिल्यांदाचा कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी आमच्यासोबत असं वर्तन केलं. तसेच रागारागाने बैठक सोडून निघून गेले. मुख्यमंत्री म्हणाले की, मी आंदोलनाच्या भीतीने बैठक बोलावलेली नाही. त्यानंतर ते म्हणाले की, जा करा आंदोलन. तसेच नंतर ते संतापून निघून गेले. बैठकीमध्ये कुठल्याही मुद्द्याव एकमत झालं नाही. आम्ही आंदोलन करणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.