बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. कोणत्याही निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून घोषणा केल्या जातात. त्याची सुरूवात बिहारमध्ये झाली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी १२५ यूनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीच्या आधीच ही योजना लागू केली जाणार आहे. १ ऑगस्टपासून ही योजना लागू केली जाणार असून, जुलै महिन्याच्या बिलापासूनच याचा लोकांना लाभ होणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या निर्णयाची घोषणा केली. 'आम्ही सुरूवातीपासूनच स्वस्तात वीज उपलब्ध करून देत आहोत. आता असा निर्णय घेण्यात आला आहे की, राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांना १२५ यूनिटपर्यंत विजेसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही', असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे.
राज्यातील किती लोकांना होणार लाभ?
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा राज्यातील जवळपास १ कोटी ६७ लाख कुटुंबा थेट लाभ मिळणार आहे. गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी ही योजना आणण्यात आली आहे.
नितीश कुमार म्हणाले की, "आम्ही हेही ठरवले आहे की, पुढील तीन वर्षांमध्ये या सर्व घरांमध्ये लोकांच्या सहमतीने त्यांच्या घरावर किंवा सार्वजनिक ठिकाणी सौर ऊर्जा प्लॅट लावले जातील."
१० हजार मेगावॅट वीज निर्मिती होणार
"कुटीर ज्योती योजनेतंर्गत जे अत्यंत गरीब कुटुंब आहेत, त्यांच्या घरी सौर ऊर्जा प्लॅट लावण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. त्याबरोबरच उर्वरित लोकांसाठीही सरकारकडून मदत केली जाईल. त्यामुळे १२५ यूनिट विजेचा कोणताही खर्च त्यांना करावा लागणार आहे. पुढील तीन वर्षात एका अंदाजानुसार, १० हजार मेगावॅटपर्यंत सौर ऊर्जा उपलब्ध होईल", असेही नितीश कुमार म्हणाले.