अररिया - बिहारमध्ये विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) म्हणजे भाजपच्या मदतीने मतचोरीचा निवडणूक आयोगाचा संस्थागत प्रयत्न आहे. यात आयोग- भाजपची भागीदारी आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.
अररियामध्ये मतदार अधिकार यात्रेदरम्यान राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासमवेतच्या पत्रपरिषदेत ते म्हणाले की, मतदार यादी पुनरीक्षण म्हणजे भाजपच्या मदतीने मतचोरीचा निवडणूक आयोगाचा संस्थागत प्रयत्न आहे. आम्ही निवडणूक आयोगाला बिहारमध्ये मतचोरी करू देणार नाहीत. निवडणूक आयोग भाजपला लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे.
इंडिया आघाडीतील पक्ष एकजूट होऊन काम करीत आहेत व याचे योग्य ते परिणाम दिसतील, असे त्यांनी म्हटले आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी लवकरच एक जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. विरोधी आघाडीचे सर्व घटक पक्ष वैचारिक व राजकीय रूपाने एकजूट होऊन काम करीत आहेत व याचे योग्य परिणाम दिसतील, असे राहुल गांधी म्हणाले.
मिठी मारली, चुंबन घेतले राहुल गांधी दुचाकीवरून अररियाकडे रवाना झाल्यावर अज्ञात व्यक्तीने त्यांना मिठी मारली व त्यांच्या खांद्याचे चुंबन घेतले. याचवेळी राहुल गांधी आपली दुचाकी स्थिर ठेवत असताना त्या युवकाला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थापड लगावून एका बाजूला ढकलले. सुरक्षेत चूक झाल्याबाबत विचारले असता, पोलिसांनी सांगितले की, याबाबत आवश्यक कारवाई करण्यात येत आहे.
विवाहाबाबत चर्चा सुरूराहुल गांधी यांनी आपल्या विवाहाबाबत अनोख्या अंदाजात म्हटले आहे की, याबाबत चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यावर बोलताना तेजस्वी म्हणाले की, त्यांनी लवकरात लवकर विवाह करावा. त्यावर राहुल गांधी हे त्यांच्याकडून माइक घेऊन अनोख्या अंदाजात म्हणाले की, हा सल्ला मलाही लागू होतो. तेजस्वी यांच्या वडिलांशी याबाबत चर्चा सुरू आहे.
९८% मतदारांची कागदपत्रे प्राप्तबिहारमध्ये ९८.२ टक्के मतदारांची कागदपत्रे प्राप्त झाली आहेत. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा भाग म्हणून प्रकाशित झालेल्या बिहारच्या प्रारूप मतदार यादीवर दावे आणि आक्षेप दाखल करण्यासाठी आता फक्त आठ दिवस उरले आहेत, असे निवडणूक आयोगाने सांगितले.
फक्त ‘आधार’ वैध पुरावा नाहीच : भाजपफक्त आधार क्रमांक हा मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी वैध पुरावा ठरतो, असे न्यायालयाने म्हटलेले नाही. बिहारमधील मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयाच्या यासंबंधी आदेशाचा अपप्रचार केला जात असल्याचा आरोप भाजपने विरोधकांवर केला.