भार्इंदर: होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीरा-भार्इंदर शहरांत पोलिसांची जादा कुमक दाखल होण्यास सुरुवात झाली असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता उपअधीक्षक सुहास बावचे यांनी व्यक्त केली आहे.या शहरांतर्गत मीरा-भार्इंदर मतदारसंघासह ओवळा-माजिवडा मतदारसंघाचा सुमारे अर्धा भाग व्याप्त होतो. यातील मीरा-भार्इंदर मतदारसंघातील लढत यंदा अत्यंत चुरशीची ठरणार असून ओवळा-माजिवडा मतदारसंघातही त्याचा इफेक्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीदरम्यान काही राजकीय पक्षांची दादागिरी अथवा कायदा व सुव्यवस्था हाती घेण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असल्याने शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होणार असल्याचे पोलीस सूत्रांकडन सांगण्यात येत आहे. शहरात सध्या राज्य राखीव पोलीस दल- पुणे येथील तुकडीचे आगमन झाले असून शीघ्र कृती दलालाही तैनात करण्यात आले आहे. येत्या दोन-एक दिवसांत दंगल नियंत्रण पथकासह विशेष बंदोबस्तातील दलांचे आगमन होणार आहे. शिवाय, स्थानिक पोलिसांसह मुख्यालयातील कर्मचारीसुद्धा शहरातील बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे निवडणुकीदरम्यान आर्थिक गैरव्यवहारांवर विभागीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा वॉच ठेवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
भार्इंदरला वाढीव कुमक
By admin | Updated: September 27, 2014 00:26 IST