Bengaluru Stampede: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयानंतर बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या दुःखद घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोठी घोषणा केली आहे. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आरसीबीच्या विजयाचे सेलीब्रेशन सुरु असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता तर ६० जण जखमी झाले होते. त्यानंतर आता चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची भरपाई रक्कम देण्याचे आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत. यापूर्वी पीडितांना १० लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता रकमेत वाढ करण्यात आली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना जाहीर केलेली भरपाईची रक्कम १० लाख रुपयांवरून २५ लाख रुपये वाढवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी ही रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना हे नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून त्यांना आर्थिक मदत मिळू शकेल.
"मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या कुटुंबियांना भरपाईची रक्कम प्रत्येकी २५ लाख रुपये करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी सरकारने प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती," असं मुख्यमंत्री कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
१८ वर्षांनंतर आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी हजारो लोक चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी जमले होते. स्टेडियम बाहेर अचानक गर्दी अनियंत्रित झाल्याने मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ११ जणांना आपला जीव गमवावा लागला आणि अनेक जण जखमी झाले.
दरम्यान, याप्रकरणी चेंगराचेंगरीच्या प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोठी कारवाई केली. या घटनेप्रकरणी पोलिस निरीक्षकांपासून ते आयुक्त स्तरापर्यंतच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. क्यूबन पार्क पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, स्टेशन हाऊस मास्टर, स्टेशन हाऊस ऑफिसर, एसीपी, सेंट्रल डिव्हिजन डीसीपी, क्रिकेट स्टेडियम इन्चार्ज, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पोलीस आयुक्त यांना तात्काळ निलंबित करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं. या अधिकाऱ्यांकडून प्रथमदर्शनी निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा दिसून आला. त्यामुळे त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.