ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी, दि. २५ - आसाममध्ये बोडो व आदिवासी यांच्यातील हिंसाचारात ७९ जणांना प्राण गमावावा लागला असताना आसामच्या उपसभापतींनी असे प्रकार नेहमी घडतातच, त्यात काय विशेष असे असंवेदनशील उद्गार काढले आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तान व बांग्लादेशातही असा हिंसाचार होतो असा दाखला त्यांनी दिला आहे. आसामचे उपसभापती भीमानंद तांती यांनी आसाममध्ये घडलेल्या हिंसाचाराला अवास्तव महत्त्व देण्याची आवश्यकता नाही असे उद्गार काढून लोकांचा प्रचंड रोष ओढवून गेतला आहे.
त्यांनी आज एका शिबिरामध्ये लोकांनी घेराव घातला आणि आपला संताप व्यक्त केला. विरोधकांनीही तांती यांच्यावर प्रचंड टीका केली असून स्वपक्षीय काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनीही तांती यांचे वक्तव्य दुर्देवी असल्याचे म्हटले आहे. हा प्रकार अत्यंत संवदेनशील असून नेत्यांनी जबाबदारीने वक्तव्य करायला हवे अशी अपेक्षा दीक्षित यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बडे बडे शहरोंमे छोटे छोटे हादसे होते असे वक्तव्य करून खळबळ माजवली, व पुढे पाटील यांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तांती यांच्यावर काँग्रेस काय कारवाई करते याकडे सगळ्यांच लक्ष लागले आहे.