Arun Jaitley: कायदेतज्ज्ञ, निपुण संसदपटू आणि आपत्ती निवारण करणारा क्रिकेटप्रेमी नेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 05:39 AM2019-08-25T05:39:33+5:302019-08-25T05:40:40+5:30

इलोक्टरल बाँड ही त्यांची योजना टीकेचा विषय बनली असली, तरी सरळमार्गाने पक्षांना पैसा उभा करण्याचा मार्ग त्यातून पुढे आला, हे नाकारता येत नाही.

Arun Jaitley: Legal expert, skilled parliamentarian and disaster relief cricketer lover | Arun Jaitley: कायदेतज्ज्ञ, निपुण संसदपटू आणि आपत्ती निवारण करणारा क्रिकेटप्रेमी नेता

Arun Jaitley: कायदेतज्ज्ञ, निपुण संसदपटू आणि आपत्ती निवारण करणारा क्रिकेटप्रेमी नेता

Next

इलोक्टरल बाँड ही त्यांची योजना टीकेचा विषय बनली असली, तरी सरळमार्गाने पक्षांना पैसा उभा करण्याचा मार्ग त्यातून पुढे आला, हे नाकारता येत नाही. आर्थिक वा सामाजिक सुधारणा समाजाला कितपत रुचतील, हे लक्षात घेऊन तितकीच पावले आधी टाकण्याची दक्षता जेटली घेत. जीएसटी, इलेक्टोरल बाँड, इनसोल्व्हन्सी कोड आदी सुधारणांतून हे लक्षात येते. झेप घेण्यापेक्षा लहानलहान सुधारणा करून अर्थव्यवस्था मार्गी लावण्याकडे जेटली यांचा कल होता. त्यांच्या काळात केंद्र सरकारची तूट मर्यादेत राहिली, हे विसरता येत नाही.

अरुण जेटली यांच्या निधनामुळे मोदींच्या सत्ता परिवारातील दरबारी राजकारणी काळाच्या पडद्याआड गेला आहे. जेटली हे जनतेमधील राजकारणी नव्हते. त्यांचा वावर दरबारात असे. त्यांची बुद्धिमत्ता, कायद्याचा अर्थ लावण्यातील निपुणता आणि विरोधकांचे कच्चे दुवे नेमके हेरण्याची क्षमता याचा उपयोग भारतीय जनता पार्टीला नेहमी होत असे. ते दरबारी राजकारणी असले, तरी काँग्रेसमधील दरबारी राजकारण्यांप्रमाणे नव्हते, हेही लक्षात घेतले पाहिजे. जेटलींच्या राजकारणामध्ये स्वार्थापेक्षा पक्षाच्या फायद्याला नेहमी अग्रक्रम होता. दिल्लीतील उच्चभ्रू वर्तुळात ते वावरत आणि खान मार्केट गँग म्हणून मोदी ज्याला हिणवत, त्या गँगमध्येही जेटली यांच्याबद्दल आदर होता. उत्तम वाक्चातुर्य व चलाख युक्तिवाद यांचा वापर करून खान मार्केट गँगचा भाजपविरोधातील प्रचार उधळून लावण्यात जेटली वाकबगार होते. असे करण्यात त्यांना बौद्धिक आनंदही मिळत होता.


जेटली दरबारी राजकारणात असले, तरी लोकभावनेची उत्तम समज त्यांना होती. गांधी घराण्याभोवती वावरणाऱ्या दरबारी लोकांपेक्षा त्यांची लोकभावनेची समज वास्तवाला धरून असे. नरेंद्र मोदी यांच्या बाजूने भारतीय जनता झुकत आहे, हे जेटली यांनी सर्वांआधी ओळखले. ते २०१४ नंतर मोदींचा विश्वासू सहकारी म्हणून जगासमोर आले. त्यांनी २०१३ मधील भाजपच्या सत्तासंघर्षात मोदींना खंदी मदत केली. मनोहर पर्रिकर व अरुण जेटली हे अडवाणी गटाला बाजूला करून मोदींना भाजपच्या शीर्षस्थानी घेऊन गेले. तथापि, त्या आधी म्हणजे २००२ मधील गुजरात दंगलीनंतरही जेटली यांनी मोदींचे समर्थन केले होते. मोदी हा उगवता तारा आहेत, हे त्यांनी फार आधी ओळखले. मात्र, असे करण्यामागे गटबाजीचे राजकारण नव्हे, तर देशाची बदलती मानसिकता ओळखण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. त्यांचे २००८ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीतील मोदींच्या विजयाचे विश्लेषण गाजले. योगेंद्र यादव व अन्य निवडणूक विश्लेषकांच्या विश्लेषणातील फोलपणा व एकांगी युक्तिवाद त्यांनी उघड केला. त्यानंतर, योगेंद्र यादव यांनीही स्वत:च्या चुकांची प्रांजळ कबुली दिली होती.


संसदपटू म्हणून जेटली अधिक चांगले चमकले. राज्यसभेतील त्यांचे काम उल्लेखनीय होते. विरोधी पक्षनेते म्हणून ते प्रभावी काम करीत. सर्व पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवीत. त्यांची टीका जहाल असली, तरी विषारी नसे. टीकेपलीकडेही मित्रभावना ठेवण्याची त्यांची वृत्ती होती. मात्र, मैत्र टिकविताना भाजपाच्या राजकीय हेतूंना धक्का पोहोचणार नाही, याची ते काळजी घेत आणि मैत्रीसाठी विचारधारा पातळ होऊ देत नसत. जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारणात आले. ते कट्टर संघीय नव्हते. संघाच्या परंपरावादी विचारसरणीपेक्षा आधुनिक विचारसरणीशी त्यांचे नाते होते. मात्र, अन्य पुरोगाम्यांप्रमाणे हिंदू आचारविचारांचा त्यांनी कधीही दु:स्वास केला नाही. त्याचबरोबर, कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे बाष्कळ समर्थनही केले नाही. सहमतीने राजकीय हेतू साध्य करण्याची कला त्यांच्याकडे होती. त्यासाठी लागणारा बौद्धिक युक्तिवाद करण्याची क्षमता होती. असा युक्तिवाद करणारा जवळचा सहकारी आता नाही, हे मोदींचे मोठे नुकसान आहे. मोदी लोकप्रिय आहेत व आपले म्हणणे सामान्य जनतेच्या गळी उतरविण्यात वाकबगार आहेत, परंतु आपल्या दृष्टिकोनाला बौद्धिक पाठबळ देण्याची क्षमता मोदींकडे नाही. ती गरज जेटली पुरी करीत. अडचणीच्या प्रसंगी संघर्ष न करता वाटाघाटीतून मार्ग काढण्याची क्षमता जेटलींजवळ होते. ट्रबलशूटर किंवा आपत्तीनिवारक अशी त्यांची प्रतिमा होती. पक्ष वा सरकार अडचणीत सापडले की त्यांच्याकडे धाव घेतली जात असे. असा नवा आपत्तीनिवारक मोदींना आता शोधावा लागेल, कारण अमित शहा नेहमी संघर्षाच्या पवित्र्यात असतात. भाजपातील अन्य नेते मोदींना मानत असले, तरी जेटलींइतके ते विश्वासाचे नाहीत.


अर्थमंत्री म्हणून जेटली यांच्या मर्यादा उघड झाल्या, हेही नमूद केले पाहिजे. मोदींना पूर्ण बहुमत होते. तरीही मोदींच्या नेतृत्वाखाली जेटली हे मनमोहन सिंग किंवा चिदम्बरम यांच्याप्रमाणे उल्लेखनीय अर्थसंकल्प मांडू शकले नाहीत. मनमोहन सिंग व चिदम्बरम यांना त्यावेळच्या पंतप्रधानांचे पाठबळ मिळाले, तसे अर्थसंकल्पात जेटलींना मोदींचे मिळाले नाही काय, याबाबत निश्चित माहिती नाही. कारण मोदींपेक्षा वेगळा माझा म्हणून आर्थिक विचार आहे, असे जेटलींनी कधी जाणवू दिले नाही. सर्वसहमतीने जीएसटी लागू करण्यातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती व देशाच्या आर्थिक इतिहासात त्याचा ठळकपणे उल्लेख होईल. जीएसटीमध्ये सुधारणा करण्यातही ते तत्पर होते. बँकावरील अनुत्पादक कर्जाबाबतही त्यांनी उचललेली पावले महत्त्वाची होती. अनुत्पादक कर्जांच्या बोज्यातून बँका बाहेर येत आहेत, त्यामागे जेटलींचे काम कारणीभूत आहे.


क्रिकेटमध्ये त्यांना विलक्षण रस होता. क्रिकेट संघटनांमध्येही ते सक्रिय होते. यातून त्यांच्यावर केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, तेव्हा त्यांनी केजरीवाल यांना कोर्टात खेचले व आरोप मागे घेण्यास लावले. कायदेशीर मार्गाने संघर्ष करण्याचा त्यांचा स्वभाव होता. काही वर्षांपूर्वी ते सत्तेत नसताना, कुलाबा येथील एका गेस्टहाउसमध्ये जेटली यांच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारण्याचा योग आला. त्यावेळी सचिन तेंडुलकर लोकप्रियतेच्या शिखरावर होता. सचिनला आव्हान देईल, असा फलंदाज आमच्या दिल्लीत तयार होत आहे, त्याच्याकडे लक्ष ठेवा, असे त्यांनी हसत सांगितले. त्यावेळच्या वीरेंद्र सेहवाग या उदयोन्मुख खेळाडूकडे त्यांचा कटाक्ष होता. सचिनची जागा तो घेईल, असे त्यांना वाटत होते. ते भविष्य खरे ठरले नाही, पण सेहवागच्या फलंदाजीने भारतीय क्रिकेटवर ठसा उमटविला, हेही नाकारता येत नाही.

- प्रशांत दीक्षित

Web Title: Arun Jaitley: Legal expert, skilled parliamentarian and disaster relief cricketer lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.