गेल्या काही वर्षांपासून या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाच्या विमान अपघाताला दोन महिने होत नाही तोच कंपनीने दिल्लीहून वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली आहेत. १ सप्टेंबरपासून जवळपास २०२६ पर्यंत एअर इंडियाचे एकही विमान वॉशिंग्टन डीसीसाठी जाणार नाही.
एअर इंडियाच्या या निर्णयामुळे आधीच या मार्गाची तिकिटे काढणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढणार आहेत. एअर इंडियाने यासाठी ऑपरेशनल घटकांचा हवाला दिला आहे. संपूर्ण मार्ग नेटवर्कची विश्वासार्हता आणि अखंडता सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या सेवा बंद करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
गेल्या महिन्यात एअर इंडियाने त्यांच्या २६ बोईंग ७८७-८ विमानांचे रेट्रोफिटिंग सुरू केले आहे. ग्राहकांच्या सेवेत सुधारणा करण्यासाठी विमाने रेट्रोफिटिंग केली जाणार आहेत. यामुळे ही विमाने लांबच्या उड्डाणासाठी उपलब्ध असणार नाहीत. ही समस्या २०२६ च्या अखेरपर्यंत सुरु असणार आहे. यामुळे एअर इंडियाच्या ताफ्यात बोईंगची विमाने नसणार आहेत. विमाने नसल्याने एअर इंडियाने वॉशिंग्टन डीसीची विमानसेवा बंद केली आहे. यानंतर आणखी काही ठिकाणांच्या विमानफेऱ्यांवरही याचा परिणाम दिसणार आहे.
ज्या प्रवाशांनी १ सप्टेंनंतरची तिकीटे बुक केली आहे, त्याच्याशी एअर इंडिया संपर्क साधणार आहे. त्यांना पर्यायी प्रवास उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामध्ये दुसऱ्या कंपन्यांच्या फ्लाईटमध्ये बुकिंग आणि फुल रिफंड असणार आहे. हे प्रवासी न्यूयॉर्क (जेएफके), नेवार्क (ईडब्ल्यूआर), शिकागो आणि सॅन फ्रान्सिस्कोचा पर्याय निवडू शकणार आहेत. अलास्का, युनायटेड किंवा डेल्टा एअरलाईनचा पर्याय यासाठी दिला जाण्याची शक्यता आहे.