एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानाच्या अपघातानंतर ही विमाने बनविणारी कंपनी बोईंगवर टीका होत होती. या विमानात कंपनीने शॉर्टकट मारले असल्याचा दावा याच कंपनीच्या कर्मचाऱ्याने केला होता. मोठमोठ्या अपघातानंतर ही विमाने विविध देशांत तपासली गेली होती. गेल्या आठवड्यातील अहमदाबाद अपघातानंतरही डीजीसीएने एअर इंडियाच्या या विमानांच्या चौकशीचे आदेश दिले होते. यामध्ये या विमानात मोठी समस्या सापडली नसल्याने एअर इंडियासह प्रवाशांनाही दिलासा मिळाला आहे.
बोईंग - ७८७ या विमानांच्या तपासणीत मोठी समस्या आढळली नाही असे डीजीसीएने म्हटले आहे. परंतू, त्याचबरोबर डीजीसीएने एअर इंडियाच्या देखभालीच्या समस्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एअर इंडियाला सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याचे आणि अभियांत्रिकी, ऑपरेशन्स आणि ग्राउंड हँडलिंग युनिट्समध्ये चांगले समन्वय राखण्याचे निर्देश दिले आहेत.
एअर इंडियाच्या बोईंग कंपनीच्या या विमानांमध्ये अनेक तांत्रिक बिघाड समोर येत आहेत. यामुळे अनेक विमान उड्डाणे रद्द केली जात आहेत. यामध्ये स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणांचाही समावेश आहे. अपघात झाल्यापासून एअर इंडिया ताकही फुंकून पित होती. थोडी जरी तांत्रिक समस्या जाणवली तरी विमान उड्डाण रद्द केले जात होते. या प्रकारामुळे आमच्याकडे पुरेशी विमाने नाहीत असेही एअर इंडियाने जाहीर केले होते.
डीजीसीएचे महासंचालक फैज अहमद किडवाई यांनी एअर इंडियाचे एमडी कॅम्पबेल विल्सन, संचालक (फ्लाइट ऑपरेशन्स) कॅप्टन पंकुल माथूर, एअर इंडिया एक्सप्रेसचे सीईओ आलोक सिंग आणि दोन्ही एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. एअरलाइन्सची ऑपरेशनल क्षमता आणि सुरक्षितता आणि प्रवासी सेवा नियमांचे पालन सुनिश्चित करण्यावरही चर्चा करण्यात आली.
एअर इंडियाकडे किती विमाने...
एअर इंडियाकडे बोईंग - ७८७ ही ३३ विमाने आहेत जी लांबपल्ल्यासाठीदेखील वापरली जातात. १७ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत २४ विमानांची तपासणी पूर्ण झाली होती. तसेच दोन विमानांची तपासणी मंगळवारी आणि एक बुधवारी पूर्ण होणार होती. उर्वरित सहा विमानांपैकी दोन विमाने दिल्लीत पार्क केलेली आहेत. तर चार विमानांची देखभाल, दुरुस्ती सुरु आहे. या सहाही विमानांची पुन्हा सेवेत येण्यापूर्वीच तपासणी केली जाणार आहे.