- रमाकांत पाटीलनंदुरबार - डॉक्टरांच्या वस्तीगृहातील खानावळीत जेवणासाठी ताटं वाढली जात असतानाच अचानक वरून वस्तीगृहाच्या इमारतीत एअर इंडियाचे विमान येवून धडकले अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. या वेळी अचानक आगडोंब उडाला आणि परिसरातील शेकडो जीवांची अक्षरश: राख झाली.
विमान अपघाताबाबत अहमदाबादमधील काही लोकांशी मोबाईलवरुन संपर्क साधल्यावर त्यांनी ही माहिती दिली. अपघातग्रस्त परिसरात जळून कोळसा झालेल्या मृतदेहांचा अक्षरश: खच पडला असून, अपघात झाल्यानंतर बचावासाठी धावून आलेल्यांपैकी काही जण हे दृश्य पाहून अक्षरश: भोवळ येवून खालीच कोसळले. या घटनेत विमानातील सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून, अक्षरश: कोळसा झालेले मृतदेह सीव्हील हॉस्पीटलमध्ये आणले गेले. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटणे शक्य नसल्याने त्यांचे डीएनए सॅम्पल घेवून ओळख पटविण्याचे प्रयत्न आहे.
यासंदर्भात गुजरातचे आरोग्य सचिव धनंजय द्विवेदी यांनी विमानातील प्रवाशांच्या जवळच्या नातेवाईकांना ओळख पटविण्यासाठी डीएनए सॅम्पल देण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी रूग्णालयातील कसोटी भवनमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रूग्णालयात स्वतंत्र कक्षही स्थापन करण्यात आला आहे.
माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी-मुलीची भेट अधुरीच...या दुर्घटनाग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजयभाई रूपाणी हेदेखील प्रवास करीत होते. त्यांची पत्नी अंजलीबेन रूपाणी ह्या सध्या लंडनमध्ये कन्या राधीकाबेन यांच्याकडे गेल्या आहेत. ते लंडनला मुलीची भेट घेवून पत्नी अंजलीबेन यांना घेवून येणार होते. यासंदर्भात त्यांनी बुधवारी सायंकाळीच गुजरातचे माजीमंत्री भुपेंद्रसिंह चुडासामा यांच्याशी झालेल्या संवादात सांगितले होते. मात्र त्यांची पत्नी व कन्याची भेट अपूर्णच राहिली.
राज्यातील स्वयंसेवकांचा संपर्कासाठी प्रयत्नअहमदाबाद व परिसरात महाराष्ट्रातील अनेक जण वास्तव्यास आहेत. संपूर्ण परिसरात छिन्न विच्छिन्न पडलेले मृतदेह तसेच खाक झालेले मानवी सांगाडे असल्याने त्याभागाचा ताबा प्रशासनाने घेतला होता. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधणे यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती अतुलभाई पटेल व मोहनभाई पटेल यांनी दिली.