एअर इंडियाच्या विमान अपघातातील मृतांचा आकडा एवढ्यात जाहीर करण्यात येणार नाहीय. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सायंकाळी विमान कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी केली. यानंतर त्यांनी जखमींवर उपचार घेत असलेल्या रुग्णालयांनाही भेट दिली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
अहमदाबाद-लंडन विमान दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आपल्या संवेदना विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसोबत असल्याचे सांगितले.
या विमानात देशातील आणि परदेशी असे एकूण २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर होते. यापैकी एका प्रवाशाचा जीव वाचल्याची चांगली घटना घडली आहे. मी त्या प्रवाशाला भेटलो आहे. डीएनए चाचणी आणि प्रवाशांची ओळख पटवल्यानंतरच मृतांचा आकडा अधिकृतपणे जाहीर केला जाईल, असे अमित शाह म्हणाले. याचबरोबर गुजरात सरकारने सर्व आपत्ती व्यवस्थापन युनिट्सना सतर्क केले आणि एकत्रितपणे बचाव कार्य सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.
विमानात १.२५ लाख लिटर इंधन होते ते जळत होते. त्यामुळे तापमान इतके वाढले की कोणालाही वाचवण्याची संधी मिळाली नाही. सर्व प्रवाशांचे मृतदेह काढण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. ज्या प्रवाशांचे नातेवाईक पोहोचले आहेत त्या सर्व प्रवाशांचे डीएनए घेण्याचे कामही २-३ तासांत पूर्ण होईल. ज्यांचे नातेवाईक परदेशात आहेत त्यांना माहिती देण्यात आली आहे, असे शाह म्हणाले.