एअर इंडियाचा अपघात किती भीषण होता याची कल्पना आता साऱ्या जगाला आली आहे. बोईंग कंपनीच्या या वादग्रस्त ड्रीमलायनर विमानाने अनेकांची स्वप्ने उध्वस्त केली आहेत. या अपघात स्थळावरून एक धक्कादायक बातमी येत आहे. ज्या डॉक्टरांच्या इमारतीवर हे विमान आदळले त्या इमारतीतील मेस चालविणारी महिला आणि तिची अडीज वर्षांची नात बेपत्ता आहेत. २४ तास झाले त्या महिलेचा मुलगा आपल्या आईला आणि चिमुकलीला शोधत आहे. परंतू, कुठेच त्यांचा पत्ता लागत नाहीय.
मेडिकल कॉलेजची मेस सरला ठाकोर आणि त्यांचे पती चालवत होते. विमान अपघाताच्या दिवशी सरला या त्यांची नात आद्याला देखील घेऊन आल्या होत्या. रवी ठाकोर यांचे वडील डबे देण्यासाठी मेडिकल कॉलेजमध्ये गेले होते, परंतू सरला आणि आद्या हॉस्टेलच्या मेसमध्येच होत्या. त्या दोघींचाही काहीच थांगपत्ता लागत नसल्याने सरला यांचा मुलगा आपल्या आईला आणि पोटच्या लेकीला वेड्यासारखा शोधत आहे. त्याने मृतदेह ठेवलेली हॉस्पिटल पालथी घातली आहेत, ज्या ठिकाणी रुग्णांवर उपचार सुरु आहेत तिथेही तो पाहून आला आहे. परंतू, कुठेच त्याला त्याची आई आणि मुलगी दिसली नाहीय.
यामुळे रवी वेड्यासारखा गेल्या २४ तासांपासून हॉस्टेल आणि मेसच्या परिसरात फिरत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला मेसमध्ये जाऊ दिले जात नाहीय. माझी आई तिथे स्वयंपाक करत होती आणि माझी मुलगी तिच्यासोबत होती. मी रात्रभर सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये त्यांचा शोध घेतला. प्रशासनाने जारी केलेल्या याद्या मी पाहिल्या आहेत, परंतु आतापर्यंत आई आणि मुलीचा कोणताही पत्ता लागलेला नाही, असे रवी याने प्रसारमाध्यमांना सांगितले.
सर्व विद्यार्थ्यांचे मृतदेह ओळखले गेले आहेत, परंतु माझ्या आई आणि मुलीची नावे अजूनही बेपत्ता लोकांच्या यादीत आहेत. मला वाटतेय की ते अपघात झाला तेव्हा पायऱ्या उतरून तळमजल्यावर गेले असावेत. मला फक्त एकदा हॉस्टेलमध्ये त्यांचा शोध घेण्याची परवानगी द्यावी, असे आवाहन त्याने अधिकाऱ्यांना केले आहे.
मेसमध्ये चपाती बनवणाऱ्या मीना मिस्त्री या वाचल्या आहेत. त्यांनी म्हटले की जसे आम्ही विमान पडताना पाहिले तसे आम्ही चाव्या, मोबाईल तिथेच ठेवून पळालो. जीव वाचवण्यासाठी धावलो, असे त्यांनी सांगितले आहे.