नवी दिल्ली : केवळ १० हजार रुपये भरून जामीन घेण्यास नकार देणार्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला त्यापेक्षा हजारपट रकमेला लोकसभा निवडणुकीच्या निकालाने मुकावे लागणार आहे. ‘आप’ने देशभरात लोकसभेच्या ५४३ पैकी ४३२ जागा लढविल्या आणि ४१४ जागांवर त्यांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. या जप्त झालेल्या अनामत रकमेपोटी ‘आप’ला आता एक कोटी रुपये गमवावे लागणार आहेत. ‘आप’च्या फक्त १८ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचविता आली. त्यात पंजाबमधील ८, दिल्लीतील ७ आणि चंदिगढ, महाराष्टÑ (चंद्रपूर) आणि उत्तर प्रदेश (वाराणशी)मधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. ४१४ जागांवर ‘आप’ उमेदवारांना एकूण मतांच्या एक षष्ठांश मते मिळविण्यात अपयश आले. मतदारसंघात झालेल्या मतदानापैकी किमान एक षष्ठांश मते मिळविणार्या उमेदवारांचीच अनामत रक्कम जप्त होत नाही. ज्यांना इतकी मते मिळत नाहीत, त्यांची अनामत रक्कम जप्त होऊन सरकारी कोषागारात जाते. लोकसभा निवडणूक लढविणार्या उमेदवाराला लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम ३४ (१) (अ) अन्वये २५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. अनुसूचित जाती, जमाती व भटक्या जमातींच्या उमेदवारांसाठी ही अनामत रक्कम १२,५०० रुपये ठेवण्यात आली आहे. एकूण वैध मतांच्या एक षष्ठांश मते मिळविण्यात अपयश आल्यास ही ‘आप’च्या राखीव मतदारसंघातील उमेदवारांची संख्या उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांनी २५ हजार रुपये भरल्याचे गृहीत धरून हा १ कोटी ३ लाख ५० हजारांचा आकडा काढण्यात आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘आप’ने गमावली एक कोटीची अनामत
By admin | Updated: May 26, 2014 03:14 IST