प्रेमात माणूस आंधळा होतो ही म्हण खरी ठरवणारं एक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला प्रेमाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. उत्तर प्रदेशातील बदायूंमधील एका आईने आपल्या प्रियकरासाठी पोटच्या मुलांचाही विचार केला नाही. इतकंच काय तर, तब्बल ३२ वर्षांचा भरला संसार मोडून ही महिला आपल्या प्रियकरासोबत पसार झाली आहे. तिच्या कुटुंबाला या प्रकरणाची काहीच कल्पना नसल्याने त्यांनाही मोठा धक्का बसला आहे. आपली पत्नी परत घरी यावी म्हणून तिच्या पतीने पोलिसांतही धाव घेतली.
बदायूंमधील उसैहत गावातील ही महिला कासगंजमधील पप्पू नामक एका व्यक्तीच्या प्रेमात पडली. हळूहळू दोघांमधील जवळीक आणखी वाढू लागली. त्यांच्यातील प्रेम इतके उफाळून आले की, दोघांनी एकमेकांसोबत जीवन-मरणाच्या आणभाका घेतल्या. याच प्रेमासाठी महिलेने आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत पळ काढला. मात्र, पतीला याची काहीच कल्पना नसल्याने तो पत्नीला शोधण्यासाठी पोलिसांत गेला. पोलिसांनी त्याच्या पत्नीला शोधून काढलं. मात्र, सगळ्यांसामोर तिने आपल्याला प्रियकरासोबत राहायचे आहे, असे म्हणून पतीलाच मोठा धक्का दिला.
३२ वर्षांचा भरला संसार मोडला!
लग्नाच्या ३२ वर्षांनंतर ही घटना घडली आहे. आपला भरला संसार सोडून महिलेने प्रियकराचा हात पकडल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या महिलेला पतीपासून ९ मुले आहेत. यापैकी दोन ३ मुलांची लग्न देखील झाली आहेत. घरात दोन सुना असून, महिलेचा पती मजूर म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. या दरम्याने त्याने आपल्या कष्टाच्या पैशांतून एक जमिनीचा तुकडा खरेदी केला होता. ही जमीन देखील त्याने आपल्या पत्नीच्या नावे केली होती.
कुटुंबाचाही विचार केला नाही!
मात्र, महिलेने ही जमीन आणि सुनांचे दागिने घेऊन घरातून पळ काढला. प्रियकरासोबत पळून जाताना तिने आपल्या १० वर्षांच्या एका मुलीलाही सोबत नेले. घरातील सगळीच संपत्ती पत्नीने सोबत नेल्याने आता महिलेचा पती देखील पश्चात्ताप करत आहे. ९ मुले , २ सुना आणि नातवंडं घरात असताना या महिलेने असे पाऊल उचलल्याने तिच्या कुटुंबाला देखील मोठा धक्का बसला आहे.