बिहारमधील बेतिया येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील कालीबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनारपट्टी येथे जमिनीवरून सुरू असलेला वाद विकोपाला गेल्यानंतर सुमारे ४० ते ५० जणांच्या जमावाने एका घरावर हल्ला केला. त्यांनी घरामध्ये झोपलेली लहान मुले, महिला, वृद्ध व्यक्ती कुणाचीही पर्वा केली नाही. या हल्ल्यामुळे हे संपूर्ण कुटुंब भीतीच्या छायेखाली आहे.
पीडित कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार अचानक मोठ्या संख्येने लोक लाठ्या-काठ्या आणि दगडविटा घेऊन घराच्या दिशेने चाल करून आले. जमावातील एका महिलेने घरात झोपलेल्या एका छोट्या मुलाला जबरदस्तीने आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यावर हल्ला अधिकच तीव्र झाला. जमावाने कुटुंबातील महिला, वृद्ध, लहान मुले सर्वांनाच कुठलीही पर्वा न करता मारहाण केली. एवढंच नाही तर घराचे दरवाजे, खिडक्या सारे तोडून टाकले. या दरम्यान, हे संपूर्ण कुटुंब घरातील एका खोलील दरवाजा कसाबसा बंद करून लपून राहिले.
या हल्ल्यामधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पीडित कुटुंबाने हल्ला होण्यापूर्वी पोलिसांकडे फोनवरून मदत मागितली होती. मात्र पोलिसांनी मदत देण्यास चालढकल केली. त्यामुळे हल्ल्याची शक्यता असताना आणि एफआयआर दाखल झाली असताना पोलिसांनी सुरक्षेचं कुठलं पाऊल का उचललं नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर या घटनेतील पीडित कुटुंबाला आपल्या सुरक्षेची चिंता सतावत आहे.