केंद्र सरकार अॅक्शनमोडमध्ये, 42 लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रांसफर झालेले 3000 कोटींची होणार वसुली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 02:28 PM2021-07-20T14:28:41+5:302021-07-20T14:33:16+5:30
Pm kisan sceme: केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये जातात.
नवी दिल्ली: 'पीएम किसान योजने' (PM-KISAN scheme) अंतर्गत केंद्र सरकारकडून देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपये पाठवले जातात. पण, अनेक अपात्र शेतकरी या योजनेचा फायदा घेत आहेत. यामुळे आता केंद्र सरकारने कारवाई सुरू केली आहे. पीएम-किसान योजनेंतर्गत 42 लाखांपेक्षा जास्त अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर गेलेले 3,000 कोटी रुपये सरकार वसुल करणार आहे. सरकारकडून संसदेत याबाबत माहिती देण्यात आली.
पीएम-किसान योजनेंतर्गत केंद्र सरकार देशभरातील शेतकऱ्यांना दरवर्षी तीन वेळा 2-2 हजार, असे एकूण 6,000 रुपये देतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही गोष्टींची पुर्तता व्याहला हवी. पण, काही अपात्र शेतकरीही या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यांच्यामुळे इतर लाभार्थ्यांपर्यंत पैसे पोहचवण्यास अडचणी येत आहेत. आता केंद्र सरकार या अपात्र शेतकऱ्यांकडून हे पैसे वसुल करणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेत दिली.
कोणत्या राज्यात किती शेतकरी
या योजनेचा फायदा घेणाऱ्या आपात्र शेतकऱ्यांची सर्वाधिक संख्या असाममध्ये आहे. असाममध्ये 8.35 लाख अपात्र शेतकरी या योजनेचा फायदा घेत आहेत. असामनंतर, तमिळनाडुत 7.22 लाख, पंजाबमध्ये 5.62 लाख, महाराष्ट्रात 4.45 लाख, उत्तर प्रदेशात 2.65 लाख आणि गुजरातमध्ये 2.36 लाख शेतकरी या योजनेचा फायदा घेत आहेत.