आझादनगर : भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाई संदर्भात गुरुवारी दुपारी मालेगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयात संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाणीटंचाईची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत मालेगाव शहरासह दाभाडी १२ गाव पाणीपुरवठा योजना व तालुक्यातील पाच गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे ठरविण्यात आले.मालेगाव शहरासह प्रामुख्याने चणकापूर धरण व गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. चणकापूर धरण हे शंभर टक्के भरले आहे; परंतु गिरणा धरणात अवघे १ हजार ७५२ दलघफू पाणीसाठा आहे. शहरासह नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजना व दहिवाळ २६ गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत किमात २ लाख ५० हजार नागरिकांना गिरणा धरणाशिवाय पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतच नाही. त्यामुळे गिरणा धरणातूनच पाणीपुरवठा करणे अनिवार्य झाले आहे. तसेच दाभाडी १२ गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत या गावांना ३० नोव्हेंबरपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा शेवाळेनाला येथे शिल्लक आहे. त्यामुळे यापुढील पाण्यासाठी १२ दलघफू पाणी सोडणे आवश्यक आहेत. परंतु पाण्याचे आवर्तन सोडल्यास नदीकिनारी असलेल्या विजपंपाद्वारे शेतकरी अर्धेपाणी शेतीसाठी उचलून घेतात. यामुळे नियोजनाचे ताळमेळ बसत नाही.मालेगाव तालुक्यातील माणके, दहिकुटे, साकुर, झाडी अशा पाच गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी आंबेदरी धरणातून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.चणकापूर धरणातील पाणीसाठा शंभर टक्के आरक्षित होण्याची शक्यता आहे. आजच्या स्थितीत हरणबारी धरण जरी शंभर टक्के भरले असून ११५० दलघफू पाणीसाठा आहे. त्यामध्ये २ ते २८ फेब्रुवारी २०१६ पर्यंत मांगीतुंगी येथे मूर्तीची स्थापना कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमासाठी लागणारी पाण्याची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून शंभर दलघफू पाणी आरक्षण ठेवण्याचे पत्र मिळाले आहेत. याखेरीज बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण व सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडूनही प्रत्येकी १०० दलघफू पाणी बागलाण व मालेगाव तालुक्यातील अजंग, वडेल, डाबली, वजीरखेडे व भायगावसाठी आरक्षित करण्याच्या मागणीचे पत्र देण्यात आले आहेत. यामुळे सर्व शक्यता गृहीत धरून अवघा ३०० दलघफू पाणीसाठी शिल्लक राहणार आहेत. परंतु गिरणा धरण ते हरणबारी यातील अंतर हे ११० किमीचे आहेत. गिरणा धरणापर्यंत पाणी पोहचण्यासाठी किमान ४०० दलघफू पाणी आवश्यकता आहेत. त्यामुळे हे पाणी सोडूनही काही एक उपयोग होऊ शकणार नाही. म्हणून मालेगाव शहरासह दहिवाळ व नांदगाव पाणीपुरवठा योजनांवरील गावांना भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.बैठकीत पाणीपुरवठ्याबाबत जलवाहिनी कामे, धरणातील गाळ काढणे व आवश्यक ते सर्व प्रस्ताव शासनाकडे तयार करून लवकरात लवकर पाठवावे असे आदेश प्रांताधिकारी अजय मोरे यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिले.बैठकीत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पी.जी. जिरे, जि.प. पाणी व्यवस्थापन उपअभियंता पी.टी. बोरसे, सहायक गटविकास अधिकारी खताळे, जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता जयवंत खरे, तहसीलदार सुरेश कोळी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.तालुक्यातील भिलकोट येथे जलवाहिनी फोडण्यात आली आहे. यासाठी संबंधित तलाठ्यास पंचनामा करण्यासाठी बोलवण्यात आले होते; परंतु तलाठी पोहचत नाही अशी तक्रार करण्यात आली. त्यावर तहसीलदार सुरेश कोळी यांनी संबंधित तलाठ्यास तत्काळ पाठवून पंचनामा करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
मालेगाव तालुक्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा
By admin | Updated: November 19, 2015 21:55 IST