नाशिक : पंचवटीतील दिंडोरी रोडवरील कलानगर मागे असलेल्या निसर्गनगर येथे रस्ते, पथदीप, स्वच्छता अशा कोणत्याही सुविधा नाहीत. त्यातच या भागातील वाघाडी नाल्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि प्रदूषणाचा वाढता त्रास आहे. पावसाळ्यात नाल्यामुळे होणारा त्रास लक्षात घेता नाल्याला संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.दिंडोरी रोडवरील हा भाग नवविकसित आहे. परंतु अत्यंत समस्याग्रस्त आहे. परिसरात कलानगर ते निसर्गनगर दरम्यान वाघाडी नाला असून, त्यात गटारीचे पाणी सोडण्यात आले आहे. तसेच नागरिक येथे कचरा आणून टाकतात. या भागात अनेक नवी बांधकामे सुरू असून, तेथील मजूर या नाल्याजवळ उघड्यावरच प्रातर्विधी करतात. त्यामुळे दुर्गंधी आणि घाणीचा त्रास नागरिकांना होतो. एकीकडे महापालिका शहर हगणदारीमुक्त करीत असताना या भागाकडे मात्र दुर्लक्ष आहे. वाघाडी नाल्याला पावसाळ्यात पूर आल्यानंतर आसपासच्या परिसरात पाणी शिरते. वाघाडी नाला नैसर्गिक असला तरी तो बुजवण्याचे काम सध्या काही बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. त्यामुळे पात्राचा संकोच झाल्याने पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने या नाल्याला संरक्षक भिंत बांधावी तसेच नाल्यावरील पुलाला संरक्षक कथडे बांधावे आणि या मार्गावर पथदीप बसवावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
वाघाडी नाल्याला संरक्षक भिंतीची गरज
By admin | Updated: June 10, 2016 22:48 IST