नाशिक : लोकसभा निवडणुकीत सुरुवातीपासून महायुतीच्या उमेदवारांना अनुकूल वातावरण जाणवत असले तरी सेनेचे हेमंत गोडसे आणि भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण हे निकाल संपेपर्यंत मतमोजणीच्या ठिकाणी आले नव्हते. छगन भुजबळ, डॉ. प्रदीप पवार यांच्यासह अन्य अनेक उमेदवार तर अखेरपर्यंत फिरकलेही नाहीत.लोकसभा निवडणुकीच्या निकालाविषयी जनसामान्य आणि कार्यकर्त्यांतही उत्सुकता होती. सकाळी आठ वाजता मतमोजणी कर्मचार्यांना गोपनीयतेची शपथ दिली गेली. त्यानंतर टपाली मते मोजण्यात आली आणि त्यानंतर मुख्य मतमोजणीला प्रारंभ झाला. अनेक वेळा मतमोजणीस उमेदवार उपस्थित राहतात किंवा कित्येकदा मतमोजणीतील कौल बघून मतदान केंद्रांत दाखल होत असतात. आज मात्र कौल आपल्या बाजूने दिसत असतानादेखील हेमंत गोडसे आणि हरिश्चंद्र चव्हाण केंद्रात आले नाहीत. नाशिकपेक्षा दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा निकाल लवकर जाहीर झाला. परंतु दीड वाजेच्या सुमारास खासदार चव्हाण दाखल झाले. त्यांच्यासमवेत भाजपाचे संघटन मंत्री डॉ. राजेंद्र फडके, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, तसेच सुरेश पाटील, गोपाळ पाटील असे अनेक पदाधिकारी होते. त्यानंतर हेमंत गोडसे यांचे आगमन झाले. त्यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, ॲड. शिवाजी सहाणे यांच्यासह अन्य पदाधिकार उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी विजयी उमेदवार म्हणून प्रमाणपत्र स्वीकारले. अन्य उमेदवारांमध्ये माकपाचे ॲड. तानाजी जायभावे आणि हेमंत वाघेरे हे देखील उपस्थित होते. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, मनसेचे डॉ. प्रदीप पवार, बसपाचे दिनकर पाटील आणि आपचे विजय पांढरे, तसेच दिंडोरी मतदारसंघातील डॉ. भारती पवार हे उमेदवार फिरकलेही नाहीत.निकालानंतर येणार्या गोडसे यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी थेट विजयी रथच मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी आणला होता. कार्यकर्ते जल्लोषासाठी येत असताना मोटारींवर शिवसेनेचे भगवे ध्वज घेऊन येत होते. मतदान केंद्रांकडे जाणार्या मार्गांवरच गुलाल उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
विजयानंतरच आले महायुतीचे उमेदवार जल्लोष निकालाचा : गोडसेंसाठी सज्ज रथ
By admin | Updated: May 17, 2014 00:42 IST