सायगाव : केंद्र शासनाने कांद्याचे निर्यातमूल्य प्रतिटन ३०० डॉलर केल्यामुळे येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याच्या आवकमध्ये कमालीची घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक पर्यायाने पुरवठा कमी होत असल्याने बाजारभावात सुधारणा झाल्याचे दिसून आले. कांद्यास उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली, छत्तीसगड, पंजाब, आसाम आदि राज्यांत मागणी चांगली आहे. सप्ताहात एकूण कांदा आवक ६५६१ क्विंटल झाली असून, गावरान कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते कमाल १७०० रुपये, तर सरासरी १२०० रुपयांपर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक ७७५५ क्विंटल झाली असून, गावरान कांद्याचे बाजारभाव किमान ३०० रुपये ते कमाल १६५२ होते, तर सरासरी १२०० रुपयांपर्यंत राहिले.केंद्र सरकारने पाऊस लांबल्याने भविष्यात देशांतर्गत कांद्याचे बाजारभाव वाढून शहरी ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल म्हणून कांद्याचे निर्यातमूल्य प्रतिटनाला ३०० डॉलरने वाढविल्याने जागतिक बाजारात कांद्याला चांगले बाजारभाव असूनही शेतकऱ्यांचा कांदा कमीदराने विक्री केला जाणार आहे. शासनाची ही नीती शेतकरी विरोधात असून, येवला तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण देवरे, शेतकरी नेते- संतु पाटील झांबरे, भाजपाचे - भाऊ लहरे, जनता दलाचे - दिनकर लोहकरे, रिपाइंचे - संजय पगारे आदिंनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला आहे. शासनाने शेतकऱ्यांना पैसा मिळू द्यावा. निर्यातमूल्य शून्यावर आणावे, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)
पालेभाज्यांची आवक ४० टक्क्यांनी घटली
By admin | Updated: June 24, 2014 00:27 IST