नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची उन्हाळी सत्र पदवी अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा आजपासून सुरळीत सुरू झाली. राज्यातील १२१ परीक्षा केंद्रांवर सदर परीक्षा घेतली जात असून, कोणत्याही केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती विद्यापीठाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, संबंधित सर्व केंद्रांना आणि प्रश्नपत्रिकांची कस्टडी असलेल्या केंद्रांना काळजी घेण्याच्या सूचना कुलगुरूंनी दिल्या आहेत. विद्यापीठाच्या वतीने आजपासून पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांना प्रारंभ झाला असून, सर्व केंद्रांवर नियोजित वेळेतच परीक्षा सुरू झाल्याचे सांगण्यात आले. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यभरातून जवळपास १२१ परीक्षा केंद्रे असून, मेडिकल, डेंटल, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम आरोग्य विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांचा प्रथम ते अंतिम वर्षापर्यंतच्या या परीक्षा सुरू झाल्या आहेत. आज प्रथम वर्ष मेडिकल शाखेचा ॲॅनाटोमी, प्रथमवर्ष होमिओपॅथी शाखेचा ॲनाटोमी, प्रथम वर्ष एमबीबीएस विद्यार्थ्यांचा संस्कृत, द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांचा द्रव्यरूप, तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचा प्रसूतितंत्र, एमबीबीएस वैद्यकीय शाखेच्या द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांचा फर्माकोलॉजी, तृतीय वर्षाचा कम्युनिटी मेडिकल मेडीसिन, बीडीएस शाखेच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा जनरल ॲनाटोमी, द्वितीय वर्ष जनरल पॅथॉलॉजी, तृतीय वर्ष जनरल मेडीसिन, तर चतुर्थ वर्षाच्या पब्लिक हेल्थ आणि कम्युनिटी डेण्टेस्ट्री तसेच इतर वैद्यक शाखेचेदेखील पेपर्स आज सुरळीत पार पडले. पदवी परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून ४३,७१५, तर पदव्युत्तर परीक्षेसाठी ४,७६५ परीक्षार्थी आहेत. लेखी परीक्षा केंद्रावर १२१ केंद्रप्रमुख व १३० केंद्र निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यभरातील ३२१ महाविद्यालयांमधील सुमारे ४८ हजार विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तरची परीक्षा देत आहेत.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परीक्षा सुरळीत
By admin | Updated: May 28, 2014 01:32 IST