नाशिक : पावसाळा सुरू होेऊन तीन आठवडे उलटले असून, अजूनही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नसला तरी, जो काही पडला त्यामुळे काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने दुष्काळी तालुक्यातील बारा टॅँकर कमी झाले, तर देवळा व सिन्नर या दोन तालुक्यांत नव्याने टॅँकर सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, दरवर्षी पावसाचे माहेरघर म्हणून झोडपून काढणाऱ्या पावसाने इगतपुरी, त्र्यंबक, पेठ, सुरगाणा या चार तालुक्यांकडे पाठ फिरविली आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्णातील २४१ गावे, ५५७ वाड्यांना २४७ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. आठवडाभरात झालेल्या पावसामुळे टॅँकरची संख्या बाराने घटली आहे. विशेष म्हणजे पावसाने नांदगाव, मालेगाव, इगतपुरी व येवला तालुक्यात हजेरी लावल्यामुळे या तालुक्याचा पाणीप्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली असली, तरी पावसाने पाठ फिरविल्यामुळे देवळा व सिन्नर या दोन तालुक्यांच्या मागणीवरून नव्याने प्रत्येकी एक टॅँकर सुरू करण्यात आल्याने जिल्ह्णातील २३१ गावे, ५८८ वाड्यांना २३७ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जून महिन्याच्या एकूण सरासरी पावसाच्या तुलनेत यंदा फक्त ६१ टक्केच पाऊस नोंदविला गेला असून, इगतपुरीत ४२ टक्के, पेठ, त्र्यंबकेश्वर १५ टक्के व सुरगाणा १९ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामानाने कमी पावसाची सरासरी असलेल्या सिन्नरला ११५ टक्के, नांदगावला ९३ टक्के, चांदवडला ८६ टक्के, देवळ्याला ७६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ३० जून रोजी जिल्ह्णाच्या सरासरीच्या १६३ टक्के पाऊस नोंदविला गेला होता.