त्र्यंबकेश्वर : आश्लेषाच्या उत्तरार्धात व मघा नक्षत्राच्या पूर्वार्धात म्हणजे जवळपास १५ दिवसांपासून त्र्यंबक तालुका परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. तालुक्यात दरवर्षी मुसळधार पावसाची नोंद आहे. ब्रह्मगिरी, गंगाद्वार परिसरातील धबधबे प्रवाहित होऊन आॅगस्टपर्यंत गोदावरीला दोन-तीन वेळा पूर येऊन गावात पाणीच पाणी होते. मात्र यंदा मुसळधार पाऊस झाला नसून संततधार सुरू आहे. गेल्या वर्षी २० आॅगस्टपर्यंत ३८९२ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. तीच यावर्षी १०८३ इतकाच पाऊस झाला आहे. त्र्यंबकेश्वरला तालुक्यात पावसाची सरासरी २२५० मि.मी. आहे. यावर्र्षी तीदेखील पूर्ण झालेली नाही. भीज पाऊस शेतीसाठी चांगला असल्याने बळीराजा खरिपाची निंदणी, खुरपणी करताना दिसत आहे.
त्र्यंबकेश्वरला संततधार; शेतकऱ्यांमध्ये समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:12 IST