त्र्यंबकेश्वर : येथील नगरपालिका जिल्ह्यातील क वर्ग नगरपालिका असून, पालिकेची शंभर टक्के वसुलीकडे वाटचाल सुरू आहे. शासनाचे पालिकेला दर वर्षी ८५ टक्के वसुलीचे उद्दिष्ट असते. हे उद्दिष्ट पूर्ण केले तरच शासनाकडून विविध शीर्षकाखाली अनुदाने मिळतात. ८५ टक्के कर वसुलीसाठी कर्मचाऱ्यांना आटापिटा करावा लागत असतो तेव्हा उद्दिष्ट पूर्ण होत असते. यावर्षी मात्र ३१ मार्च पूर्वीच ९५ ते ९६ टक्के वसुली पूर्ण झाली आहे. गाळे भाडे वसुलीसाठी प्रशांत पोतदार, घरपट्टी वसुलीसाठी दीपक बंगाळ व चंद्रकांत काळे, तर पाणीपट्टी वसुली हरचंद चित्ते व सागर गायकवाड यांनी प्रयत्न केले. या सर्वांना मुख्याधिकारी डॉ. चेतना मानुरे-केरुरे यांचे मार्गदर्शन लाभले. नगरसेवक, नगराध्यक्ष यांनीही हस्तक्षेप न करता वसुलीसाठी सहकार्यच केले. जी चार-पाच टक्के वसुली दिसून येते त्यासंदर्भात शहरात ज्या नवीन वसाहती नव्यानेच समाविष्ट करण्यात आल्या आहेत त्यांना पालिकेने अवाजवी कर आकारणी केल्याचा दावा त्या रहिवाशांनी केला आहे. याशिवाय पालिकेने त्यांना अद्यापपावेतो कुठल्याही नागरी सुविधा दिल्या नसल्याने कर आकारणी केलीच कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)
त्र्यंबक पालिकेची सुमारे ९६ टक्के कर वसुली
By admin | Updated: April 3, 2017 00:37 IST