नांदगाव : सर्वत्र ३जी - ४जीचे वारे वाहत असताना तालुक्यातील २-जीची सेवा सुरळीत देण्यात भारत संचार निगम लिमिटेड अपयशी ठरत असल्याने ग्राहकांनी इतर खासगी कंपन्यांकडे जाणे पसंत केले. एकूणच तालुक्यातील बीएसएनएल सेवेच्या तक्रारींचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच अधिकाऱ्यांची धावपळ झाली, तर गेल्या आठवड्यापासून बंद असलेला जामदरीचा मोबाइल टॉवर जसा सुरू झाला तसाच बंदही पडला हेविशेष.दूरसंचार क्षेत्रात दिवसेंदिवस स्पर्धा वाढत असताना बीएसएनएलकडून मात्र उदासीन भूमिका घेतली जात असल्याने त्याचा भुर्दंड सर्वसामान्य ग्राहकांना बसतो आहे. खासगी कंपन्यांकडून ३-जीची सेवा उपलब्ध करून दूरसंचार क्षेत्रात आघाडी घेतली आहे, तर दुसरीकडे बीएसएनएलकडून २-जीही सेवा सुरळीत दिली जात नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. एकीकडे खासगी कंपन्या लाखो रुपये कमवित आहेत, तर दुसरीकडे बीएसएनएल तोट्यात जात असल्याचे चित्र आहे. याचा ग्रामीण भागातील ग्राहकांना मोठा फटका बसतो आहे. वाढती इंटरनेट व कॉल्सचा सेवा लहरींच्या कार्यक्षमतेवरच परिणाम होतो ही बाब असली तरी त्यासाठीची आधुनिक साधनसामग्री तालुक्यात पुरविण्यात आली आहे. मात्र ती कार्यान्वित करण्यात आणि अधिकची सामग्री मिळाली नसल्यानेच सेवा सुरळीत करण्यास अडचणी येत आहेत. त्याचा परिणाम मात्र ग्राहकांच्या सेवेवर होऊन ते दूर जाण्यात होतो आहे. याबाबत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाशिक जिल्ह्यातील दूरसंचार सेवेसंदर्भात प्रश्न संसदेत उपस्थित केला होता. येत्या काळातही याबाबत पाठपुरावा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.(वार्ताहर)