सिंहस्थात आखाड्यांसाठी राखीव ठेवलेली संपूर्ण जागा यंदाही द्यावी. त्या जागेवर झालेले अतिक्रमण पूर्णत: काढावे, तसे न झाल्यास सिंहस्थावरच बहिष्कार टाकू, असा इशारा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी दिला. सिंहस्थाच्या कामांची पाहणी करण्यासाठी नाशिकमध्ये आले असता मुंबई नाका येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, इतर ठिकाणी ज्याप्रमाणे होतो तेवढ्याच भव्य प्रमाणात येथेही सिंहस्थ होतो. महाराष्ट्र आणि नाशिक जगभरात प्रसिद्ध आहे. येथील सिंहस्थही भव्यदिव्य असाच व्हावा, ही आमची इच्छा आहे. त्यामुळे पाहणी करून येथील अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यासाठी, तसेच बैठकीत सहभागी होण्यासाठी मी येथे आलो आहे. सिंहस्थ जवळ आला असून, अद्यापही कामांची सुरुवात नसल्याने त्याबाबतही आपण अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. उद्या संपूर्ण दिवसभर नियोजनाची पाहणी करून ३० रोजी होणाऱ्या बैठकीत प्रशासनाला योग्य त्या सूचना करू, असेही ते म्हणाले. अरुंद शाही मार्ग आणि नवा शाही मार्ग याबाबत विचारले असता चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना पुन्हा घडू नये, अशीच आमचीही इच्छा आहे. यासाठी मार्ग रुंद हवेत आणि नव्या शाही मार्गाबाबत आपण अधिकाऱ्यांशी, तसेच आखाड्यांशी चर्चा करून मगच निर्णय घेऊ, असेही महंत ग्यानदास म्हणाले. पवित्र गोदावरीचे पावित्र्य जपले जायला हवे. साधू- संतांना देण्यात येणाऱ्या सुविधा चांगल्या असाव्यात. आता आमच्या आखाड्यांची संख्या वाढली आहे. पूर्वी १५० महंत होते, आता ते ७०० झाल्यामुळे त्यांना पुरेशी जागाही उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. यासाठी आम्हाला पूर्वी दाखविलेल्या जागेचा नकाशा आणि आश्वासन दिले तेवढी जागा उपलब्ध करून द्यायला हवी. त्या जागेवर जर अतिक्रमण झाले असेल, तर ते पाडण्यात यावे, अन्यथा आम्ही सिंहस्थ होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. याप्रसंगी आमदार वसंत गिते, महापौर यतिन वाघ, मनसे जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, महंत भक्तिचरणदास, महामंडलेश्वर देवबाप्पाजी महाराज, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)