नाशिक : जागतिकीकरणाच्या युगात प्रचंड स्पर्धा वाढली असताना भारतातील शिक्षणप्रणाली अद्याप बदललेली नाही. नावीन्यतेचा, चिकित्सक दृष्टिकोनचा अभाव यांसह विविध समस्यांनी शिक्षणव्यवस्था ग्रासली आहे. त्यासाठी शिक्षकांनी व्यापक चळवळ उभारून भविष्याचा वेध घेत विद्यार्थी घडविले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय इन्डिपेंडन्ट लेबर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील यांनी केले. मु. शं. औरंगाबादकर सभागृह येथे इन्डिपेंडन्ट सेकंडरी अॅण्ड हायर सेकंडरी टीचर्स युनियनच्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक मुंबई विद्यापीठातील लोककला विभागाचे विभागप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे, प्रा. गंगाधर अहिरे, अॅड. अंकिता मुदलियार, संघटनेचे अध्यक्ष रोहित गांगुर्डे, सरचिटणीस किशोर शिंदे, कार्याध्यक्ष संजय साळवे, सूर्यभान जगताप उपस्थित होते. पाटील म्हणाले, विकसनशील भारतासमोर दर्जेदार, कौशल्याधिष्ठित विद्यार्थी घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. मात्र त्या शिक्षकांपुढेदेखील विविध समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न होणे गरजेचे आहे. विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये, शिक्षक भरतीला लागलेला ब्रेक, संस्थाचालकांची मनमानी यांसह विविध प्रश्न गंभीर स्वरूपाचे बनल्याने शिक्षकांनाही ज्ञानदानाचे कार्य करणे कठीण झाले असल्याचे पाटील म्हणाले. डॉ. चंदनशिवे यांनी मनोगत व्यक्त करताना, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे काम निष्ठेने करीत राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. ग्रामीण भागात शिक्षणाची दुरवस्था असून, यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भावी नागरिक घडविण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे, असेही डॉ. चंदनशिवे म्हणाले. यावेळी शिक्षकांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक रोहित गांगुर्डे यांनी केले. सूत्रसंचालन किशोर शिंदे यांनी केले. (प्रतिनिधी)आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकइन्डिपेंडन्ट सेकंडरी अॅण्ड हायर सेकंडरी टीचर्सच्या वर्धापनदिनी शिक्षकांना गौरविण्यात आले. यात प्रा. भारत शिरसाठ, डॉ. मिलिंद बागुल, अशोक निकम, मिलिंद यादव, किसन चव्हाण, रोहिणी शिंदे यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष संघटन पुरस्कार नानासाहेब पटाईत यांना प्रदान करण्यात आला. तर अनिल माळी, भारती भोये, अशोक दाणी, गंगाधर खुरकुटे, मिलिंद शिरसाठ, रमेश पवार, शांताराम गांगुर्डे, शिवाजी माळी, गणेश अहिरे, दिगंबर नारायणे, कल्पना जगताप, के. के. गांगुर्डे, अन्सारी शिफक अहमद अजीज शेख, वंदना भोये या शिक्षकांचा जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
भविष्याचा वेध घेत शिक्षकांनी विद्यार्थी घडवावे
By admin | Updated: February 26, 2017 23:06 IST