रेडगाव खुर्द : जूनसह जुलैचा पहिला आठवडा कोरडा गेल्याने परिसरासह चांदवड तालुक्यातील खरीप हंगाम हातचा जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. खरिपाच्या पेरण्या नाही, रानशिवारातील विहिरी, बोअरवेलही कोरड्या पडल्याने जनावरांचा चारा, पाण्याची तीव्र टंचाई भेडसावत आहे. तसेच हाताला काम नाही अशा विविध समस्यांनी शेतकऱ्यांसह सर्व समस्यांग्रस्त असताना प्रशासन आणि सत्ताधारी नावाची यंत्रणा मूग गिळून आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून तालुक्यात अल्प व अनियमित हजेरी लावणाऱ्या पावसाने यावर्षी चांगलीच वक्रदृष्टी केल्याने अख्खा जून महिना कोरडा गेला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सून सक्रिय होईल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तवले होते. त्यानुसार मुंबई परिसरात पाऊस आल्याच्या वार्तेने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु जुलैचा पहिला आठवडा संपला असला तरी पावसाचा थेंब नाही. वाऱ्याची गती कमी नाही, रात्रीच्या वेळी उन्हाळ्याप्रमाणे आकाश निरभ्र होत असून, पावसाने नेहमीप्रमाणे हवामान खात्याच्या अंदाजाला चकवा दिल्याचे चित्र आहे.तसेच जनावरांच्या वैरणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतकरी चाऱ्याच्या शोधार्थ फिरू लागले आहे. वैरण म्हणून चार हजार रु पये गुंठा दराने ऊस आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तसेच रोजंदारीवर गुजराण करणाऱ्या हाताना काम नसल्याने त्यांनाही आजूबाजूच्या शहरात रोजगार शोधावा लागत आहे.आज ना उद्या पाऊस येईल या आशेवर केलेली टमाट्याची लागवड, सूक्ष्म सिंचनाचा खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना व तालुकावासीयांना दिलासा देण्यासाठी चारा, पाण्याची उपलब्धता तसेच संभाव्य संकटावर मात करण्यासठी आम सभा, टंचाई आढावा बैठक घेऊन अपेक्षित व करावयाच्या उपाययोजनांबाबत कार्यवाही होणे गरजेचे असताना त्याबाबत चकार शब्द काढायला कुणी तयार नाही. एकूणच अद्याप पावसाचा थेंब न पडल्याने मशागतीपासून ठप्प झालेली कामे, पुढ्यात आलेली दुष्काळसदृश स्थिती, घेऊन ठेवलेली महागडी बैलजोडी, चारा-पाणी, रोजगाराची समस्या अशा विविध बाजूने येथील शेतकरी, शेतमजूर आदि हवालदिल अन् समस्याग्रस्त असताना शेतकऱ्यांना वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)