लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : खरीप हंगामाखालील लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढल्याने येवला तालुक्यातील शेतकऱ्यांची खरीपपूर्व मशागतीची कामे जोरात सुरू झाली असून, आगामी हंगामात याहीवर्षी कपाशीसह सोयाबीन क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. सध्या तालुक्यातील सर्वच भागात खरीपपूर्व शेती मशागतीची कामे जोरात चालू आहेत. उन्हाळ्यात शेती मोकळी झाल्यावर शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी आदी कामे करून घेतली आहेत. शेतात अलीकडील काळात बैलांद्वारे मशागत करण्याचे प्रमाण कमी झाले असून, नांगरणी, वखरणी यासाठी सर्रास ट्रॅक्टरचा उपयोग केला जात असल्याने शेतीची पेरणीपूर्व मशागतही चांगली होत आहे. शिवाय वेळही वाचत आहे. कापसाला मिळणारा भाव, शासकीय खरेदी केंद्रावरील मिळणारा बाजारापेक्षा कमीचा भाव, बियाणे व खताच्या वाढलेल्या किमती, मजुरांचा प्रश्न व वेचणीचा दर यामुळे कापसाचे पीक हे आतबट्ट्याचे ठरले असले तरी कापसासह सोयाबीनकडे ओढा काही कमी होत नाही.कापसाचे नामांकित कंपन्यांचे बियाणे वापरले तरी गेल्या वर्षी अपेक्षित चांगले उत्पन्न मिळाले नाही. कापूस वेचणीसाठी शेतकऱ्याला प्रतिकिलो ५ रुपयापासून १० रु पयाप्रमाणे वेचणी द्यावी लागते. यामुळे यावर्षी बहुतांश शेतकरी कापसाऐवजी घरचेच सोयाबीनचे बियाणे वापरून पीक घेण्याचे बोलत आहेत.बळीराजाने उन्हाळ्याच्या प्रखर झळा सोसल्यानंतर आता पावसाळ्याची चाहूल लागली आहे. चार महिन्यांच्या कालखंडानंतर शेतातील खरीपपूर्व मशागतीची कामे करताना ग्रामीण भागातील महिला व पुरुष दिसत आहेत. शेताची नांगरणी केल्यानंतर आता शेतातील काडीकचरा उचलून बांधावर टाकणे तसेच औताच्या मदतीने नागरी केलेल्या रानामध्ये पाळ्या दिल्या जात आहेत. सध्या वातावरणात झालेला बदल पाहताच शेतकरी राजा सुखावला असून, काही दिवसांत पावसाचे आगमन होणार हे हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार निश्चित असल्याने शेतातील मशागतीचे कामे करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी कृषी विभागाने कडधान्य लागवडीवर विशेष भर देण्यासाठी जनजागृती केल्याने खरीप हंगामात तूर, मूग, उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले. परंतु यंदा तुरीच्या भावाने दगा दिला.तूर आणि कापसाच्या अर्थकारणाने दिलेला दगा, दरवर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच खते बी-बियाण्यांच्या तुटवड्यामुळे धुमसणारा असंतोष आणि यंदा बँकांकडून पीककर्जाची हमी नसणे या पार्श्वभूमीवर शेतकरी पुन्हा एकदा खरिपाच्या तयारीला लागला आहे. गेल्या वर्षी कापसाच्या भावातील चढउतार शेतकऱ्यांसाठी जीवघेणी ठरली. कापूस लागवडीपासून ते वेचणीपर्यंतचा सर्व खर्च वजा जाता कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती नफा येण्याऐवजी पदरी निराशा आली. तरीही बहुतांश शेतकऱ्यांना कापसाशिवाय दुसरा पर्याय नसल्याने शेतकरी कापसालाच प्राधान्य देत आहेत. गेल्या काही वर्षांत ओलिताखाली होणाऱ्या कापसाचे प्रमाण वाढले आहे. या कापसाची लागवड मे महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. या लागवडीसाठी सध्या शेताची मशागत करणे सुरू आहे. शेतकऱ्यांनी या सर्व निराशेच्या पार्श्वभूमीवर खरिपाची पूर्वतयारी जोरात चालवली आहे. कापसासाठी पूर्व मशागत करून शेतकरी बियाणे व खताची तजवीज कशी करावी ही भ्रांत शेतकऱ्यांना आहे.गेल्या काही वर्षांत ठिबक सिंचनाखाली कापसाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असताना शासनाची ठिबक सिंचनाची अनुदान देण्याबाबतीतली धरसोड वृत्ती पाहू जाता यावर्षी शेतकरी ठिबक सिंचनासाठी खेटे घालत असला तरीही वितरकांकडून त्याला योग्य तो प्रतिसादही मिळाला नाही. ठिबक संचाचे अनुदान देण्यात सरकार टाळाटाळ करत असल्याने वितरक कोणतीही जोखीम घ्यायला तयार नाही.सध्या शेतीतली सर्व कामे यांत्रिकीकरणाद्वारे सुरू असून, खरीपपूर्व मशागतीच्या कामात शेतकरी गुंतला आहे. दरवर्षीच्या निराशेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा कंबर कसली असून, पेरणीआधीचे सर्व काटेकोर नियोजन करण्याकडे शेतकऱ्यांनी सध्या आपले लक्ष केंद्रित केले आहे.
खरीपपूर्व मशागतीच्या कामांना प्रारंभ
By admin | Updated: May 20, 2017 01:02 IST