सुनील शिंदे
घोटीइगतपुरी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती सत्ताधारी सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करीत नाराज सदस्यांनी सभापती आणि उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. अविश्वास ठराव मंजूर झाल्यास पंचायत समितीमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींवर अविश्वास दाखल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही रामदास घारे यांच्याविरुद्ध तत्कालीन सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. तो मंजूरही झाला. परंतु त्यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती. विद्यमान स्थितीत कॉँग्रेसने मनसेच्या मदतीने सत्ता स्थापन करून मनसेला उपसभापतिपद देऊ केले होते. दोन वर्ष कोणताही विरोध न होता पंचायत समितीचा कारभार सुरळीत चालू होता. असे असताना अविश्वास दाखल करण्याची वेळ का आली? यावर सध्या तालुक्यात चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या ताब्यात असलेली ही पंचायत समिती ताब्यात घेताना कॉँग्रेसने मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला विश्वासात न घेता मनसेच्या दोन सदस्यांना बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली. अनुसूचित जमाती महिलेसाठी सभापतिपद आरक्षित असल्याने ठकूबाई सावंत सभापतिपदी विराजमान झाल्या तर उपसभापतिपदी मनसेचे रमेश जाधव यांना संधी मिळाली. सत्ताबदल झाल्यानंतर तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र नवीन सभापती आणि उपसभापतींनी मूलभूत समस्यांकडे गांभीर्याने पाहिले नाही. या आणि इतर कारणांमुळे सदस्यांत नाराजी होती. यातूनच अविश्वास ठराव दाखल करण्यात आला.अविश्वास ठराव मंजूर झाल्यास सभापतिपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिजाबाई कौले यांना सभापतिपद मिळेल हे निश्चित समजले जाते, तर उपसभापति-पदासाठी गोपाळ लहांगे, पांडुरंग वारुंगसे यांच्या नावाची चर्चा असून, यात कोण बाजी मारते हे आगामी कालच ठरविणार आहे.