भगूर : भगूर शहर विकास आघाडी या नोंदणीकृत गटातून शिवसेनेत प्रवेश केल्याप्रकरणी विद्यमान नगराध्यक्ष स्वाती झुटे यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर आघाडीतून फुटलेल्या इतर नगरसेवकांना आता धडकी भरली आहे. जिल्हाधिकार्यांच्या कारवाईमुळे विकास आघाडी पुन्हा सावरण्याची शक्यता असल्याने भगूर पालिकेत पुन्हा सत्तांतर अटळ मानले जात आहे. पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत जिल्हाधिकार्यांनी नगराध्यक्ष स्वाती झुटे यांचे नगरसेवक व नगराध्यक्षपद रद्द केले आहे. त्यामुळे आघाडी सोडून इतर पक्षांमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांवरदेखील कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीपोटी या नगरसेवकांची आता ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एकूणच घडामोड पाहता आगामी काळात भगूरच्या राजकारणात विकास आघाडीला पुन्हा गतवैभव प्राप्त होण्याची शक्यता बळावली आहे. डिसेंबर २०११ मध्ये शिवसेना वगळता इतर सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी एकत्र येत भगूर शहर विकास आघाडीची स्थापना केली होती. त्या माध्यमातून पालिकेवर विकास आघाडीचा झेंडा फडकला होता. भगूर शहर विकास आघाडीच्या प्रथम नगराध्यक्ष म्हणून भारती साळवे यांची निवड झाली. त्यांनी वर्षभर कामकाज पाहिले. आघाडीमध्ये ठरल्यानुसार सर्वांना संधी मिळावी या हेतूने साळवे यांनी राजीनामा दिला आणि शैलजा वसंत कापसे यांना आघाडीने उमेदवारी घोषित केली.याचवेळी आघाडीच्या स्वाती झुटे यांनी आघाडीचा व्हिप झुगारून शिवसेनेच्या पाठिंब्यावर भगूरचे नगराध्यक्षपद मिळविले. त्यानंतर विकास आघाडीच्या नगरसेवक शैलजा कापसे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश घेतला, तर भारती साळवे यांनीही छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच नगरसेवक दीपक बलकवडे संगीता कासार, शोभा भागवत यांनीही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे विकास आघाडीच्या अस्तित्वाचादेखील प्रश्न निर्माण झाला होता. परंतु नुकतेच जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी स्वाती झुटे यांना पक्षांतर बंदी कायद्यात दोषी ठरवित, त्या जनराज्य आघाडीच्या नव्हे, तर विकास आघाडीच्या घटक असल्याचा निष्कर्ष काढत व्हिप झुगारल्याप्रकरणी झुटे यांचे पद रद्द केले. या निकालाने ज्यांनी आघाडी सोडून इतर पक्षात प्रवेश केला तो प्रवेश कायदेशीर नसून हे सर्व भगूर नगरपालिकेत भगूर शहर विकास आघाडीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या १७ रोजी होणार्या भगूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)