नाशिक : राज्यातील ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसभाडे प्रवासात सवलत मिळावी यासाठी राज्य व केंद्र सरकारने दिलेली ओळखपत्रे ग्राह्य धरण्यात यावी, अशी सूचना परिपत्रकाद्वारे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाने दिली आहे. वाहकांकडून वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली करत ज्येष्ठ नागरिकांची बसभाडे सवलतीसाठी अडवणूक करण्यात येत असल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य व केंद्र शासनाने दिलेली ओळखपत्रे राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या प्रवास भाडे सवलतीसाठी ग्राह्य धरण्यात यावीत, असे नमूद करण्यात आलेले असतानाही काही वाहक हे ज्येष्ठ नागरिकांकडून बसभाडे सवलतीसाठी केवळ आधार कार्डाची मागणी करून तेच ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरतात. वास्तविक ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य परिवहन प्रवासभाडे सवलतीसाठी केवळ आधारकार्डच हे ओळखपत्र ग्राह्य ठरण्यात यावे, अशा प्रकारची सूचना करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने दिलेली ओळखपत्रे ग्राह्य धरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचे पालन वाहक, कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकारी यांनी करावे, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. असे असताना काही वाहक ज्येष्ठ नागरिकांची अडवणूक करतात अशी तक्रार साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे ज्येष्ठ नागरिक, शैक्षणिक, सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मोतीराम अहिरे, उपाध्यक्ष रमेश कांबळे, भीमराव गरुड, शांताराम पाटील, सुमनबाई अहिरे, पद्माकर जोशी आदिंनी केली आहे. अन्य ज्येष्ठ नागरिक संघटनांनीदेखील अशीच तक्रार केली आहे. (प्रतिनिधी)
बसभाडे सवलतीसाठी ज्येष्ठ नागरिकांची अडवणूक
By admin | Updated: August 23, 2015 23:05 IST