दिंडोरी : शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालविलेला उपक्र म म्हणून जागतिक पातळीवर दखल घेतला गेलेला वाघाड सिंचन प्रकल्प सिंचन व्यवस्थापनेचे रोल मॉडेल म्हणून सांगितला जात आहे. समन्यायी पाणीवाटप, पीकस्वातंत्र्य, घनमापनपद्धतीने पाणीवाटप, टेल ते हेड सिंचन, श्रमदानाने कालवा दुरुस्ती, शंभर टक्के पाणीपट्टी वसुली, आगावू पाणीपट्टी भरणा, काटकसरीने पाणीवापर या सूत्रांचे कटाक्षाने पालन आणि पाणीवापर संस्थांचा पारदर्शक व्यवहार यामुळेच हा प्रकल्प नावारूपास आलेला असताना यंदा मात्र या पाणीवाटप संस्थेच्या हक्काचे पाणी शेतकऱ्यांना आश्वासन देऊनही सोडले जात नसल्याने पाणीवाटप संस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाघाड कालव्यांना त्वरित आवर्तन सोडावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पाणीवाटप महासंघाच्या अध्यक्ष पार्वताबाई शिंदे, कार्याध्यक्ष रामनाथ वाबळे, उपाध्यक्ष सिंधूबाई नाठे, संस्थापक अध्यक्ष शहाजी सोमवंशी, संचालक चंद्रकांत राजे, माजी अध्यक्ष शिवाजी पिंगळ यांनी दिला आहे.वाघाड प्रकल्पअंतर्गत झालेल्या पाणी नियोजनात संस्थेने यंदा दुष्काळी परिस्थितीचा विचार करत जास्तीचे पाणी वाट्याला येत असताना कमी पाणी घेण्याचे मान्य करत नियोजन झाले. यानुसार पाणीवापर संस्था यांना शासनाने धरणात उपलब्ध झालेल्या पाण्याच्या प्रमाणात संस्थाना देय पाणी ६६० दलघफू कोट्यातून रब्बीचे ३०९ दलघफू पाणी घेतले तर उर्वरित ३५१ दलघफू पाणी शिल्लक असताना गेल्या दोन महिन्यापासून संस्थेच्या कार्यकारी मंडळाने विविध स्तरावर पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी, आयुक्त, अधीक्षक अभियंता यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करूनही पाणी देण्याबाबत तोंडी अश्वासन दिले. परंतु आजपर्यंत पाणी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने संभ्रम कायम ठेवला आहे. मध्यंतरी प्रशासनाने लोकप्रतिनिधी तसेच पाणीवापर संस्थांना विश्वासात न घेता वाघाड धरणातून अचानक पाणी पालखेड धरणात सोडले गेले. वरील सर्व संस्थांनी १० मार्च रोजी शांततेच्या मार्गाने धरणावर जाऊन आंदोलन करून नदीला सोडलेले पाणी बंद करून वाघाड धरण रिकामे करण्याचा प्रशासनाचा डाव हाणून पाडला. आज वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेच्या झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसा ठराव मुख्य अभियंता यांना पाठविण्यात आला आहे असे संस्थेच्या अध्यक्ष पार्वताबाई शिंदे, कार्याध्यक्ष रामनाथ वाबळे, उपअध्यक्षा सिंधूबाई नाठे, ताई वडजे, संचालक चंद्रकांत राजे, शिवाजी पिंगळ, शहाजी सोमवंशी, चंद्रकांत वाघ, भास्करराव गायकवाड, मधुकर पवार, तुषार वसाळ, सुरेश घुमरे, प्रभाकर विधाते, प्रकाश नाठे, पुंजा शिंदे, विजय वडजे, भरत कावळे, सचिव बाळासाहेब कदम आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
रोल मॉडेल : कालव्यांना त्वरित पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी
By admin | Updated: April 2, 2016 00:08 IST