नाशिक : शहर व परिसरातील विविध वृक्षांचे बुंधे संरक्षक जाळ्यांनी कापले जात आहे; मात्र पालिकेच्या उद्यान विभागाने डोळेझाक केल्याने वृक्षांचा जीव धोक्यात आला असून याकडे नाशिकरोड पर्यावरण समितीने अशा वृक्षांचे छायाचित्र काढून त्याचे अल्बम भेट देऊन लक्ष वेधले आहे.नाशिकरोडच्या तरुण पर्यावरणस्नेही मित्रांनी एकत्र येत नाशिकरोड, उपनगर, गांधीनगर, जेतवननगर, जेलरोड आदि परिसरात भ्रमंती करून सुमारे पाच ते दहा वर्षे जुन्या वृक्षांचे बुंधे संरक्षक जाळ्यांनी कापले जात आहे. यामुळे वृक्षांचा जीव धोक्यात आला असून महापालिकेच्या उद्यान विभागाने याबाबत मोहीम सुरू करुन तत्काळ वृक्षांच्या बुंध्यात रुतलेल्या संरक्षक जाळ्या मोकळ्या करण्याची मागणी निवेदनाद्वारे उद्यान विभागाचे प्रमुख महेश तिवारी यांच्याकडे केली आहे. उद्याने, वाहतूक बेटे, दुभाजक, मोकळे भूखंड आदि ठिकाणी पूर्ण वाढ झालेल्या वृक्षांच्या संरक्षक जाळ्या तातडीने काढून घ्याव्या. विकासकांना विकसित करण्यासाठी दिलेली वाहतूक बेटे, उद्याने, वृक्ष यांची पडताळणी व्हावी, आदि मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे. निवेदनावर शिवा ताकाटे, सागर कुशारे, राहुल बोराडे, प्रतीक पवार, धीरज अहिरे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)
संरक्षक जाळ्या वृक्षांच्या मुळावर
By admin | Updated: September 29, 2016 00:17 IST