. येवला : आश्वासन देऊनही शासनाने अनुदान देण्यासह प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केले. या न्याय्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने बारावीची रोज एकच उत्तरपत्रिका तपासून, उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकत असहकार पुकारला आहे. हे असहकार आंदोलन इंग्रजीच्या उत्तरपत्रिकेपासून सुरू झाले आहे. मागण्यांची दखल घेईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे संघटनेने सांगितले आहे.नाशिक येथे सर्व नियामकांनी संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा. संजय शिंदे, जिल्हा सचिव प्रा. अनिल महाजन यांच्या सहीनिशी मंडळाचे सचिव आर. आर. मारवाडी यांना मागण्यांचे निवेदन दिले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित असून, शासनाने सर्व मागण्यांची महिन्यात अंमलबजावणी करण्याचे महासंघास आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता न झाल्याने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. त्यावेळी झालेल्या चर्चेत तीन निर्णय घेऊन १५ दिवसांत आदेश काढण्याचे शिक्षणमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. परंतु अद्याप कृती झालेली नसल्यामुळेच बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. आमची भूमिका आडमुठेपणाची अजिबात नाही उलट शासनाकडून आमची व पालक - विद्यार्थी यांची दिशाभूल सुरू आहे, असे संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.तालुक्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी या आंदोलनात सहभाग घेतला असून, रोज एकच उत्तरपत्रिका तपासण्याचे संघटनेने ठरविले आहे. आमच्या मागण्या रास्त असून, त्याची दखल घ्यावी, अशी मागणी माध्यमिक शिक्षक संघटनेने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष प्रा.एम.पी. गायकवाड, प्रा. के.एन. धनवटे, प्रा. ए.टी. ठोले, प्रा. संतोष विंचू यांच्यासह प्रा. पी.ए. कोकणे, प्रा. बी.पी. शेलार, प्रा.बी.एस. पैठणकर, प्रा. डी.बी.मुडे, प्रा. एस.एस. सोनवणे, प्रा. एस.पी. वाबळे, प्रा. सी. एच. जोशी, प्रा. एस. एस. बेंद्रे, प्रा. बी. एस. दराडे, प्रा. एस. आर. सोनवणे आदिंनी केली आहे.
प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापकांचे असहकार..
By admin | Updated: March 5, 2017 00:51 IST