प्रगतशील माणसाचा नदीशी संबंध काळानुरूप बदलत गेला. या नैसर्गिक संपत्तीकडे दुर्लक्ष होत गेले. नागरीकरण आणि औद्योगिकीकरण करताना हा पाण्याचा स्त्रोत, जीवनासाठी पाणी देणाऱ्या स्त्रोताकडे काळजीपूर्वक न पाहिल्यामुळे त्या स्त्रोताची अवस्था वाईट होत गेली. शहरीकरणाचा किंवा पटापट वाढणाऱ्या मानवी वसाहतींचा आणि औद्योगिकरणाचा विपरित परिणाम नद्यांवर झाला. शहरातील घाण वाहून नेणारी नैसर्गिक सोय म्हणून माणसाने नदीकडे पाहिले. वाढत्या, नागरीकरणामध्ये मूलभूत सुविधा अपुऱ्या पडत होत्या. त्या उभारल्याच जात नव्हत्या. त्यात नदीला हानी पोहोचवणारी आणि तिचे स्वास्थ्य बिघडवणारी उभारली न गेलेली मूलभूत सुविधा म्हणजे सांडपाण्याचे नियोजन, व्यवस्था पारंपरिक पद्धतीने घरातील सांडपाण्यासाठी शोष खड्डा करून त्यात सोडणे असे अजूनही बहुतांश नागरी, उपनगरी गावांमध्ये चालू आहे. बऱ्याच उपनगरी, वसाहतीमध्ये सांडपाणी खुल्या गटारींमधून वाहते व नदीपर्यंत पोहोचते किंबहुना पोहोचवले जाते. नैसर्गिक उताराचा फायदा घेऊन या खुल्या गटारी नदीपर्यंत पोहोचतात व तेथे त्या सांडपाण्याचा निचरा होतो. औद्योगिक भागातून व कारखान्यांमधून पण जवळपास असलेल्या नाल्यांमध्ये त्यांचे घाण पाणी सोडले जाते. या छोट्या छोट्या नाल्यांचे पाणी आपोआप नदीच्या मुख्य प्रवाहाला येऊन मिळते. अशा या प्रदूषणामुळे नदीतील पाणी खराब होते. एवढेच नव्हे तर नदीतील जैविक विविधतेचा ऱ्हास होतो. नदीच्या दोन्ही तटांवर सुद्धा त्याचा विपरित परिणाम होतो. आजकाल शहरांमधला घनकचरासुद्धा नदीमध्ये फेकला जातो आणि त्यामुळे प्रदूषणाची पातळी आणखी खालावते. शहरामधील सांडपाणी नद्यांमधून वाहत नद्यांच्या खालच्या टप्प्यावर जाते आणि तेथील वसाहतींनासुद्धा धोका पोहोचवते. तेथील पिण्याच्या पाण्यावर परिणाम होतो. कधी कधी हे प्रदूषित पाणी नदीवर बांधलेल्या धरणांमध्ये पोहोचते आणि त्याचा धोकादायक परिणाम मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे नद्यांच्या प्रदूषणावर जागोजागी उपाययोजना करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातून वाहणाऱ्या कृष्णा व गोदावरीचा प्रवाह ६० टक्के प्रदूषित झालेला आहे. या प्रदूषित लांबीमध्ये त्या नद्यांच्या उपनद्यांचाही समावेश आहे. ज्या ठिकाणी या नद्यांमध्ये पाणी नाही (म्हणजे बहुतांश भागात जिथे या नद्यांमध्ये जेव्हा फक्त पावसाळ्यामध्ये पाणी वाहते) तिथे पावसाळ्याव्यतिरिक्त वेळेत / महिन्यामध्ये परिस्थिती न बघवणारी असते.मुख्य अथवा प्रमुख प्रवाहाबरोबर उपनद्यासुद्धा अत्यंत प्रदूषित आहेत. गोदावरीच्या खाम, सुखना, पेनगंगा, नाग, पिळी, मांजरा या नद्या त्यांच्या आजूबाजूला आणि किनाऱ्यावर असलेल्या वसाहतीमुळे अत्यंत प्रदूषित झालेल्या आहेत. या नद्यांमधील प्राणवायूचे प्रमाण किमान पातळीपेक्षा खूप कमी आहे. त्यातील रासायनिक घटकांचे प्रमाण कमाल पातळीपेक्षा खूप जास्त आहेत. नियमावली तयार करणे गरजेचे आहे. शहर विकास आराखड्यात जसे रस्त्यांचा आराखडा व नियमावली तयार केलेली असते तसेच नदीच्या विकासासाठी करणे आता आवश्यक आहे. - डॉ. सौ. प्राजक्ता बस्तेलेखिका पर्यावरण तज्ज्ञ आहेत व मानवी वसाहती व जल एक नैसर्गिक संपत्ती या विषयाच्या अभ्यासक आहेत.
प्रदूषित नद्या : एक ज्वलंत समस्या
By admin | Updated: June 10, 2016 23:43 IST