नाशिक : राज्यशासनाने एलबीटी रद्द केल्यानंतरही नाशिकमध्ये पेट्रोल-डिझेल आकारणे सुरूच असून, त्यासंदर्भात निर्भय फाउंडेशन या संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी करून भारत पेट्रोलियमला नोटीस पाठविली. त्यामुळे कंपनीने लगेचच शासनाकडे यासंदर्भात निर्णय प्रलंबित असून, तोपर्यंत सहकार्य करण्याची विनंती या संस्थेला केली आहे. पेट्रोल आणि डिझेलवर आकारला जाणारा एलबीटी १ आॅगस्ट रोजीच रद्द झाला आहे. तथापि, नाशिकमध्ये पंपचालकांचा एलबीटी पेट्रोल कंपन्या भरीत असल्याने अद्यापही पेट्रोल आणि डिझेल दोन रुपये जादा दराने विक्री केली जात आहे. नागरिकांकडून बेकायदेशीररीत्या आकारल्या जाणाऱ्या कराबाबत निर्भय फाउंडेशनचे संस्थापक मनोज पिंगळे आणि अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, पेट्रोलियम कंपन्यांचे अध्यक्ष त्यात प्रतिवादी करण्यात आले आहेत. ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल नसल्याने पेट्रोल पंपचालकांना एलबीटी लागू होत नसताना कंपन्या हा कर वसूल करीत आहे. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. सदरची नोटीस मिळाल्यानंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे पश्चिम विभागाचे रिटेल हेड पी. एस. रवि यांनी निर्भय फाउंडेशनला पत्र पाठविले असून, एलबीटी रद्द संदर्भात शासनाकडून स्पष्टीकरण मिळवण्याची प्रक्रिाया सुरू आहे, असे कळविले आहे. तोपर्यंत सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीने नागरिकांकडून वसूल केलेला एलबीटी कंपनीने न वापरता तो महापालिकेला द्यावा आणि महापालिकेने हा निधी गरिबांच्या शिक्षणावर खर्च करावा, अशी मागणी मनोज पिंगळे यांनी केली आहे.
पेट्रोल स्वस्त करतोय, कंपनीचे पत्र
By admin | Updated: August 23, 2015 23:03 IST