नाशिक : ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने मुंबईला आझाद मैदानावर विभागनिहाय धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास १६ जुलैपासून राज्यभरात बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे युनियनने स्पष्ट केले आहे.ग्रामपंचायत स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करणे, ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतनात वाढ करणे, कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षांचा कालावधी सेवेत दाखल झाल्यापासून सेवेत ग्राह्ण धरणे, वीस ग्रामपंचायतींमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करणे, ग्रामसेवकांना ११०० ऐवजी कायम प्रवास भत्ता म्हणून तीन हजार रुपये करण्यात यावा, ग्रामसेवकांच्या बदलीचे धोरण एकच ठेवण्यात यावे, गेल्या चार-पाच वर्षांपासून राज्य सरकारी दरबारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मांडून वेळोवेळी त्यासंदर्भात बैठका घेऊनही सरकारने त्यावर निर्णय न घेतल्याने अखेर ग्रामसेवक युनियनने आंदोलनाचे पाऊल उचलले असून, राज्यातील २३ हजार ग्रामसेवक या आंदोलनात सहभागी झाले असून, त्यामुळे राज्यातील २७ हजार ९२७ ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाल्याचा दावा ग्रामसेवक युनियनने केला असून, ही आरपारची लढाई आहे. जोपर्यंत मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन सरकार देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.१६ जुलैपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची धार तीव्र करण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एल. जी. गायकवाड, उपाध्यक्ष खाशाबा जाधव, कोषाध्यक्ष बापू अहिरे, अनिल कोल्हे, संजय पाटील, उमाजी बोरसे यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)
प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे धरणे
By admin | Updated: July 11, 2014 00:34 IST