नाशिक : तळेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या हिंसक घटनांना पायबंद घालण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्तालयात सोमवारी (दि़१०) सर्वपक्षीय नेते तसेच शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ सदरची घटना ही निंदनीय असून, ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा सखोल व कायदेशीर तपास करीत आहेत़ त्यामुळे शहरात हिंसक कारवाया, रास्ता रोको करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी बैठकीत सांगितले़तळेगाव प्रकरणावर काही कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर रास्ता रोको, वाहनांची तोडफोड, जाळपोळ, दगडफेक केल्याचे कृत्य हे निंदनीय आहे़ या घटनांचे लोण सर्वच ठिकाणी पसरून सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले़ तसेच सोशल मीडियावर चुकीचा संदेश व अफवा पसरविण्यात आल्यामुळे यामध्ये अधिकच भर पडली़ जाळपोळीच्या घटनांची चौकशी सुरू आहे. यातील काहींची नावे निष्पन्न झाली असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.आमदार देवयानी फरांदे यांनी अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाईची मागणी केली़, तर महापौर अशोक मुर्तडक यांनी राजकीय पक्ष तसेच संघटनांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले़ मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी तरुणांना कायदा व सुव्यवस्थेसाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले़ या बैठकीस आमदार सीमा हिरे, माजी मंत्री शोभा बच्छाव, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, नगरसेवक विलास शिंदे, शशिकांत जाधव, डी. जी. सूर्यवंशी, हरिश भडांगे, शिवाजी चुंभळे, संजय साबळे, कविता कर्डक, राजेंद्र बागुल, शाहू खैरे, विनायक खैरे, नाना महाले, दत्ता पाटील, पवन क्षीरसागर, अशोक दिवे, अजिंक्य साने आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शांतता समिती : जाळपोळ करणाऱ्यांवर होणार कारवाई
By admin | Updated: October 11, 2016 01:10 IST