देवरगाव येथे आषाढीनिमित्त पालखी
By Admin | Published: July 8, 2014 11:21 PM2014-07-08T23:21:29+5:302014-07-08T23:21:29+5:30
देवरगाव येथे आषाढीनिमित्त पालखी
विनायक येसेकर - भद्रावती
ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात स्वच्छतेचे महत्व समाजाला सांगितले. ज्यांच्या नावाने शासनाने स्वच्छता अभियान आणि स्पर्धेच्या योजना सुरू केल्या. अशांचेच पुतळे शहरातील एका मध्यभागात रहदारीच्या ठिकाणी कित्येक वर्षांपासून घाणीच्या विळख्यात उभे आहेत. अशी दुरवस्था ठेवणाऱ्या नगर परिषद प्रशासनाला या महात्म्यांच्या कार्याची महतीच कळली नसावी, असे दिसून येते.
संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोन्ही महान विभुतींचे पुतळे घुटकाळा वॉर्डातील झाडे प्लॉट भागातील डॉ. संजय ठाकरे यांच्या दवाखान्याजवळील खुल्या जागेवर घाणीच्या विळख्यात गेल्या कित्येक वर्षांपासून उभे आहेत. संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर हातात खराटा घेवून गावेच्या गावे झाडून स्वच्छ केली आणि या दरम्यान नागरिकांना स्वच्छतेचे महत्व आपल्या किर्तनातून सांगितले. स्वच्छतेमुळे रोगराई होत नाही. शरीर आणि मन सुदृढ राहते. याची महती त्यांनी समाजाला प्रबोधनातून पटवून दिली तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीतेत याच प्रकारे स्वच्छतेचे महत्व सांगितले आहे.
महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम, नागरी स्पर्धा आणि संत गाडगेबाबा ग्रामनागरी स्वच्छता अभियान गेल्या अनेक वर्षांपासून सुरु केले आहे. यात अनेक ग्राम आणि नागरी विभागातील स्थानिक संस्थांनी भाग घेवून पारितोषिकेही पटकाविली आहेत.
ज्यांच्या नावाने शासन त्यांच्या कार्याची दखल घेवून एकीकडे स्वच्छतेच्या व निर्मल ग्राम व नागरी स्पर्धा राबवित असताना याठिकाणी मात्र या दोन्ही विभूती कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ उभ्या आहेत. यासंदर्भात काही सुज्ञ नागरिकांनी नगर प्रशासनाला सूचना करुन देखील त्यांनी आजतागायत याकडे लक्ष दिले नाही.
याच विभुतींच्या नावे काही सामाजिक संस्था दरवर्षी मोठमोठे कार्यक्रम राबवून लाखो रुपये खर्ची घालतात. परंतु या संस्थाच्या प्रमुखांचे लक्ष सुद्धा या विभूतींच्या पुतळ्यांकडे गेले नसावे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकूणच पालिकेचा दुर्लक्षितपणा संताप आणणारा आहे.