लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरचा वापर व्हावा यासाठी राष्टÑीय पातळीवरून जनजागरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ईव्हीएम विरोधी राष्टÑीय जन आंदोलनाच्यावतीने महाराष्टÑात काढण्यात आलेल्या ईव्हीएम विरोधी महाराष्टÑ यात्रेचे शुक्रवारी सायंकाळी नाशकात आगमन झाले. यावेळी सर्व विरोधी पक्षांच्यावतीने या यात्रेचे स्वागत करून नंतर ईव्हीएम विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
सायंकाळी पाच वाजता शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ यात्रेचे आगमन होताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ईव्हीएम विरोधात मतदारांकडून जागेवरच अर्ज भरून घेण्यात आले. यावेळी यात्रे सोबत आलेले फिरोज मिठावाले, रवि बिर्लाणी, ज्योती बिडकर, धनंजय विदे, युसूफ परमार, जय परांजपे यांनी यात्रेमागचा उद्देश सांगून, ईव्हीएमच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांकडून निवडणूका जिंकल्या जात असल्याचा आरोप केला. त्यामुळे जनतेने ईव्हीएम नको ही मोहीम हाती घ्यावी त्यासाठी यात्रेत सहभागी व्हावे. येत्या ३१ आॅगष्ट रोजी या यात्रेचा मुंबईत समारोप होणार असल्याने त्यासाठीी सर्वांनी हजर राहावे असे आवाहनही केले. यावेळी वत्सला खैरे, राजेंद्र बागुल. सुचेता बच्छाव, संतोष ठाकूर, सुरेश आव्हाड, बबलू खैरे, ज्ञानेश्वर काळे, आशा तडवी, गिरीष मोहिते, अरूण दोंदे, राजू देसले, सुनील मालुसरे, शशी उन्हवणे यांच्यासह विरोधी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.